धाराशिव: धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीत राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २अ ,७ ब आणि १४ ब मधील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, याचा परिणाम थेट नगराध्यक्षपदाच्या निकालावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमका गोंधळ काय?
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जांच्या (नामनिर्देशन पत्र) छाननीनंतर घेतलेल्या निर्णयाविरोधात काही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. यावर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली, मात्र अद्याप न्यायालयाचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असल्याने कायदेशीर पेच टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जागांवरील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
नगराध्यक्षपदाचा निकाल लांबणीवर?
राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत. तीन प्रभागांतील निवडणुका स्थगित झाल्यामुळे, जर ठरलेल्या वेळेत मतदान व मोजणी झाली नाही, तर नगराध्यक्षपदाची मतमोजणी आणि पर्यायाने निकालही लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयोगाच्या पत्रातील नियमावलीनुसार इतर नगरपालिकांमधील परिस्थिती पाहिली तर संपूर्ण राज्याच्या निकालावर याचा परिणाम होऊ शकतो.
राज्यातील २५ नगरपालिकांमध्ये असाच गोंधळ
हा प्रकार केवळ धाराशिवपुरता मर्यादित नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील किमान २५ नगरपालिकांमध्ये अशाच प्रकारचा कायदेशीर गोंधळ आहे. राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या पत्रात धाराशिवसह इतर नगरपालिकांचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
आज राज्य मुख्य निवडणूक आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिसीद्वारे (Video Conference) चर्चा झाली. या चर्चेत हा विषय प्रकर्षाने समोर आल्यानंतर निवडणूक विभागाने तातडीने हे पत्र काढून संबंधित प्रभागांतील निवडणूक स्थगितीचे आदेश दिले आहेत. आता यावर पुढे काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्दे:
-
स्थगित प्रभाग: धाराशिव नगर परिषदेचे प्रभाग क्र. २अ ,७ ब आणि १४ ब
-
कारण: छाननी प्रक्रियेविरोधातील याचिकांवर जिल्हा न्यायालयाचा निर्णय प्रलंबित.
-
परिणाम: नगराध्यक्षपदाची मतमोजणी आणि निकाल लांबण्याची शक्यता.
-
व्याप्ती: राज्यातील सुमारे २५ नगरपालिकांमध्ये अशीच परिस्थिती.
- प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये भाजपचे शहराध्यक्ष अमित शिंदे विरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे कृष्णा मुंडे हे निवडणूक लढवत आहेत. मुंडे यांनी शिंदे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे.





