धाराशिव: बस स्थानकावर प्रवाशाचे पैसे चोरणाऱ्या भामट्याला सोडून देणाऱ्या धाराशिवच्या आनंदनगर पोलिसांचा आणखी एक भोंगळ आणि संतापजनक कारभार चव्हाट्यावर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत असतानाही पोलीस कारवाई करत नाहीतच, उलट “आम्ही चोराला पकडले तरी तुमचे दागिने परत मिळतीलच असे नाही,” असे अजब आणि उद्विग्न करणारे उत्तर पोलिसांकडून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्याय मिळवण्यासाठी एका सामान्य महिलेला आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव घ्यावी लागली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
-
चोरीची घटना: धाराशिव येथील मलेरिया कॉलनीत राहणाऱ्या स्नेहा मिनुनाथ फिस्के (वय ३०) या १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता परिवारासह सोलापूरला जाण्यासाठी धाराशिव बस स्थानकावरून शिवशाही बसमध्ये चढत होत्या.
-
८० हजारांचे गंठण लांबवले: बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत दिपाली काळे (रा. साठेनगर) नामक महिलेने त्यांच्या पर्समधून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे (३ तोळे ९४० ग्रॅम) सोन्याचे गंठण हातोहात लांबवले.
-
सीसीटीव्हीत आरोपी कैद: बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सदर महिला चोरी करताना स्पष्ट दिसली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रीतसर एफआयआर (गुन्हा क्र. ००४५) दाखल करण्यात आला.
पोलिसांची उडवाउडवी आणि अजब तर्क:
गुन्हा दाखल होऊन आणि सीसीटीव्हीत आरोपी स्पष्ट दिसत असूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. आरोपी दिपाली काळे ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी स्नेहा फिस्के यांनी कारवाईसाठी वारंवार आनंदनगर पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले, मात्र पोलिसांकडून त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
कहर म्हणजे, पोलिसांनी फिर्यादीला स्पष्टपणे सांगितले की, “जरी आम्ही त्या चोराला पकडले, तरी त्यांच्याकडून चोरी केलेले गंठण रिकव्हर करता येत नाही”. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.
थेट मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे धाव:
आनंदनगर पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे नक्कीच चोरांवर कारवाई होईल की त्यांना पोलिसांकडूनच अभय दिले जाईल, अशी शंका फिर्यादीने व्यक्त केली आहे. पोलिसांकडून न्याय मिळण्याची आशा मावळल्याने, स्नेहा फिस्के यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे २४ आणि २५ मार्च २०२६ रोजी लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
एकीकडे पोलीस गुन्हेगारांना पकडण्याऐवजी त्यांच्या वकिलासारखी भाषा करत असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायला कुणाकडे जायचे? हा संतप्त सवाल आता धाराशिवकर विचारत आहेत.






