धाराशिव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. होळीच्या सणादिवशी दोन गटात तुफान राडा झाला होता, त्याचे केंद्रस्थान देशपांडे स्टॅन्ड परिसर होता,. त्याची शाई वाळते न वाळते तोच छत्रपती संभाजीराजे जयंती दिवशी याच परिसरात पुन्हा एकदा राडा झाला आहे. त्यावेळी दोन गट आमने – सामने होते, यावेळी पोलीस आणि शंभूभक्त आमने – सामने होते.
छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त इंगळे गल्लीतील सन्मित्र मंडळाने शंभूराजेंच्या मूर्तीची मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक देशपांडे स्टॅन्ड परिसरात आल्यानंतर पोलिसांनी डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितले. डीजेवाल्याने ऐकले नाही म्हणून त्यावर पोलिसांनी काठी मारली. त्यात डीजेचा काही भाग तुटला. यावरून सन्मित्र मंडळाचे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून शंभुराजाची मूर्ती रस्त्यावर ठेवली. यामुळे तणाव वाढला. पोलिसांनी कार्यकर्त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. दोन तास झाले तरी वाद मिटत नव्हता , त्यामुळे पोलीस चिडले आणि बळाचा वापर करून लाठीचार्ज केला.त्यात डीवायएसपी स्वप्नील राठोड जास्तच आक्रमक दिसले. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये १० ते १५ कार्यकर्त्यांना मार लागला तर ३ ते ४ जण जबर जखमी झाले.
पोलिसांनी विनाकारण डीजे फोडला, लाठीचार्ज केला म्हणून सकल मराठा समाज आक्रमक झाला. त्यांनी बुधवारी पोलीस मुख्यालयवर मोर्चा काढून डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्यासह दोषी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या धाराशिव शहरात तणावपूर्ण शांतता आहे. कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
धाराशिव शहर विकासाच्या बाबतीत कोसो दूर आहे. मात्र वाद -विवाद , भांडणे, हाणामारी, दंगल यांच्या बाबतीत पुढे आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने येथे तणाव असतो. विशेषतः देशपांडे स्टॅन्ड परिसर, गणेशनगर, खाजानगर, नेहरू (बाजार ) चौक भाग अधिक संवेदनशील आहे. शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणांत सुरु आहेत. मटका आणि गुटखा राजरोस सुरु आहे. पोलीस हप्तेखोरीत व्यस्त आहेत, त्यामुळे गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. पोलिसांचा वचक संपला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी चांगले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा दाग नाही. परंतु अवैध धंदेवाल्याकडून वसुली करणारे पोलीस साहेबाबरोबर व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत आणि आपण साहेबांच्या किती जवळ आहोत हे अवैध धंदे करणाऱ्याला दाखवत आहेत तसेच स्थानिक पोलीस निरीक्षकांवर छाप मारून साहेबानी अवैध धंदे सुरु करण्यास परवानगी दिल्याचे भासवत आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पोलिसांच्या बदल्या होणार आहेत. उमरगा, नळदुर्ग, मुरूम, तुळजापूर, येरमाळा येथे वसुली करणाऱ्याची पोलीस मुख्यालयात बदली होणार का ? तसेच स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षे तळ ठोकणाऱ्याला पोलीस कल्याण विभागासारखे बिन महत्वाचे डिपार्टमेंट मिळणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. पोलीस विभागाला भ्रष्ट्राचाराची वाळवी लागल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. राजा आंधळा आहे, प्रजा मुकी आहे आणि गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, त्यामुळे धाराशिव शहर आणि जिल्हा अशांत झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे.
– सुनील ढेपे
संपादक, धाराशिव लाइव्ह