मुरुम : पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या त्रासाला कंटाळून एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दाळींब (ता. उमरगा) येथे घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळू उर्फ सूरज देवीदास राठोड (वय ३५, रा. शास्त्री नगर तांडा, दाळींब) असे मृत तरुणाचे नाव आहे. सूरज यांची पत्नी आशा राठोड आणि युवराज दत्तू भोळे (रा. दाळींब) यांच्यात अनैतिक संबंध होते. सूरज यांनी अनेकदा दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपले संबंध सुधारण्याऐवजी सूरज यांनाच शिवीगाळ व धमक्या देण्यास सुरुवात केली.
या सततच्या त्रासाला आणि मानहानीला कंटाळून सूरज राठोड यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:०० ते ९:३० च्या सुमारास दाळींब शिवारातील स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
याप्रकरणी मयताचे नातेवाईक मनोहर देवराव उर्फ देवीदास राठोड (वय ४२) यांनी ११ फेब्रुवारी रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी युवराज दत्तू भोळे आणि आशा काळू उर्फ सूरज राठोड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम: १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५). कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:
मुरुम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमुळे दाळींब परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







