धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ जागांचे निकाल आज जाहीर झाले असून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटील यांनी ‘तेर’ गटातून दणदणीत विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. मात्र, अध्यक्षपद ‘महिला खुला’ प्रवर्गासाठी राखीव असल्याने अर्चना पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार की सावंतांच्या विरोधामुळे त्यांचे स्वप्न भंगणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीचे पक्षनिहाय बलाबल (एकूण जागा ५५)
| पक्ष | विजयी उमेदवार |
| भाजप | १८ |
| शिवसेना (शिंदे गट) | १५ |
| शिवसेना (ठाकरे गट) | ०८ |
| राष्ट्रवादी (अजित पवार गट) | ०६ |
| अपक्ष | ०४ |
| काँग्रेस | ०३ |
| समाजवादी पक्ष | ०१ |
अर्चना पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई
लोकसभा निवडणुकीत सव्वा तीन लाख मतांच्या फरकाने पराभूत झाल्यानंतर अर्चना पाटील यांनी स्थानिक राजकारणातून पुन्हा उभारी घेण्याचे ठरवले. त्या स्वतः ‘तेर’ गटातून निवडणूक लढवून विजयी झाल्या आहेत. यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला ओपनसाठी राखीव असल्याने या पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
युतीची गणिते आणि सावंतांचे आव्हान
भाजप १८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी २८ या आकड्याची गरज आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती असली तरी जिल्हा पातळीवरील समीकरणे वेगळी आहेत.
-
सावंतांची प्रतिज्ञा: शिंदे गटाच्या १५ पैकी ८ जागा या तानाजी सावंत यांच्या गटाच्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान आमदार तानाजी सावंत यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर घणाघाती टीका करत, “अर्चना पाटील यांना अध्यक्ष होऊ देणार नाही,” अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती.
-
समीकरणे बदलणार? भूम-परंडा-वाशी वगळता युती असली तरी सावंतांच्या विरोधानंतर शिंदे गटाच्या सदस्यांची भूमिका काय असेल, यावर अर्चना पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे.
‘माऊली’चे स्वप्न साकार होणार की भंगणार?
एकीकडे लोकसभेच्या पराभवानंतर अर्चना पाटील यांनी मिळवलेला हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे, तर दुसरीकडे अंतर्गत विरोधामुळे अध्यक्षपदाची खुर्ची त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्पष्ट बहुमत नसल्याने अपक्ष आणि मित्रपक्षांची मनधरणी करताना भाजपची दमछाक होण्याची शक्यता आहे.
सावंतांच्या विरोधाला डावलून भाजप अर्चना पाटलांना अध्यक्षपदावर बसवण्यात यशस्वी होते की धाराशिवच्या राजकारणात नवीन वळण येते, हे येणारा काळच ठरवेल.




