धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘तेर’ गट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तेर गटात ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि ‘हाय व्होल्टेज’ होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दोन ठिकाणच्या अर्जावरून जोरदार टीका
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सक्षणा सलगर यांनी अर्चना पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अर्चना पाटील यांनी ‘तेर’ आणि ‘केशेगाव ‘ या दोन गटांतून उमेदवारी अर्ज भरल्याच्या मुद्द्यावरून सलगर यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “अर्चना पाटील यांना स्वतःच्या विजयाबद्दल आत्मविश्वास नसल्यामुळेच त्यांनी दोन ठिकाणी अर्ज भरले आहेत. पक्ष केवळ आपल्या खिशात असल्यासारखे वागत, त्यांनी दोन जागा अडवल्या आहेत. मग बाकीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का?” असा तिखट सवाल सलगर यांनी उपस्थित केला.
सर्वसामान्य वि. प्रस्थापित लढत
या लढतीला ‘घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य’ असे स्वरूप देताना सलगर म्हणाल्या, “मला कोणताही राजकीय वारसा नाही, मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे. समोरची उमेदवार ही पैसेवाली आणि प्रस्थापित घराण्यातील आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, आता जिल्हा परिषद निवडणुकीतही जनता त्यांना धूळ चारणार आहे.”
अध्यक्षपदावरून खुले आव्हान
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या महत्वाकांक्षेवरूनही सक्षणा सलगर यांनी अर्चना पाटलांना खुले आव्हान दिले आहे. “अर्चना पाटील या केवळ अध्यक्षपदासाठीच निवडणूक लढवत आहेत. जर त्या खरोखर जनतेसाठी लढत असतील, तर त्यांनी जाहीर करावे की त्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नाहीत आणि एखाद्या सामान्य महिलेला अध्यक्ष करण्याची तयारी दाखवावी,” असे आव्हान सलगर यांनी दिले.
सक्षणा सलगर यांची ओळख ‘फायर ब्रँड’ नेत्या म्हणून असल्याने आणि दुसरीकडे अर्चना पाटील या बड्या राजकीय घराण्यातील असल्याने, तेर गटातील ही लढत आता जिल्हाभर लक्षवेधी ठरणार आहे.





