धाराशिव: जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये आता एक मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे दोन सदस्य पळवल्याच्या कारणावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये निर्माण झालेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांनी मोठा डाव टाकला असून, चक्क राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला अध्यक्षपद देण्याची बोलणी सुरू केली आहे.
अजित पवार गटाला अध्यक्षपदाची ऑफर
भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या खेळीला उत्तर देण्यासाठी तानाजी सावंत यांनी विरोधी सर्व गटांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सविता बिराजदार (बलसूर) यांना अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सविता बिराजदार या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बिराजदार यांच्या पत्नी आहेत.
अजित पवार गटाला आले ‘किंगमेकर’चे महत्त्व
धाराशिव जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे ६ तर शिवसेनेचे (शिंदे गट) १५ सदस्य आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी तानाजी सावंत आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करता येते का? याची चाचपणी भाजपकडूनही सुरू आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांच्या साठमारीत आता अवघे ६ सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
सत्ता संघर्षाची मूळ किनार:
-
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. (भाजप- १८, शिवसेना शिंदे गट- १५, ठाकरे गट- ८, राष्ट्रवादी- ६, काँग्रेस- ३, समाजवादी पक्ष- १, अपक्ष- ४).
-
आमदार राणा पाटील यांनी स्वतःच्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, अपक्ष आणि शिवसेनेचे दोन असे ३१ सदस्य कोकण दौऱ्यावर पळवून नेल्याचा आरोप आहे.
-
“मित्र पक्षाचे दोन सदस्य पळवून नेणे हा युतीधर्म आहे का? पहिले दोन सदस्य परत द्या, मगच बोलणी,” अशी ठाम भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतच्या वाटाघाटीचे सर्वाधिकार आ. तानाजी सावंत यांना दिले आहेत.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील या राजकीय साठमारीत आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) कोणाच्या पारड्यात वजन टाकणार आणि धाराशिव जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





