धाराशिव | आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी दांपत्य श्री. बाबासाहेब माधव माने आणि सौ. प्रभावती बाबासाहेब माने यांना मिळाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.
“भक्तीला पद, पैसा किंवा प्रसिद्धी लागत नाही; लागते ती अखंड श्रद्धा आणि जिथे श्रद्धा असते, तिथे पांडुरंग स्वतः सन्मान देतो,” अशा शब्दांत आमदार पाटील यांनी माने दांपत्याच्या विठ्ठलभक्तीचे कौतुक केले.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, गेली वीस वर्षे एकही वारी न चुकवता पायी पंढरपूरची वारी करणारे माने दांपत्य त्यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील वारकरी आहेत. विठ्ठलभक्ती, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि निस्वार्थ समर्पण यामुळे त्यांना हा सन्मान मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गौरगावच्या मातीतून निघालेली ही भक्ती आज थेट पांडुरंगाच्या दरबारात सन्मानित झाल्याने संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा अभिमान उंचावल्याची भावना आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली. तसेच श्री. बाबासाहेब माने आणि सौ. प्रभावती माने यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून “जय हरी माऊली!” असा संदेशही त्यांनी दिला आहे.





