कळंब: घरासमोर कुत्र्याने घाण (संडास) केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका कुटुंबाला लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कळंब शहरातील साठेनगर भागात घडली आहे. या हाणामारीत फिर्यादी आणि त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले असून, दगडफेकीत एका शेळीच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब येथील साठेनगर भागात राहणारे फिर्यादी करण कल्याण ताटे (वय २८) आणि आरोपी यांच्यात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास वाद झाला. कुत्र्याने संडास केल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला होता.
यावेळी आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून करण ताटे आणि त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड, काठ्या, फरशीचे तुकडे आणि दगडांनी त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या भांडणादरम्यान आरोपींनी भिरकावलेला एक दगड फिर्यादीच्या शेळीच्या पिल्लाला लागला, ज्यामध्ये त्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. जाताना आरोपींनी कुटुंबाला जिवे मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी करण ताटे यांनी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत:
-
राजेंद्र बन्सी ताटे
-
करण संदेश गायकवाड
-
विमल संदेश गायकवाड
-
अरुण राजेंद्र ताटे
-
विमलची बहीण बप्पी
-
प्रथमेश राजेंद्र ताटे
-
यश राजेंद्र ताटे
-
इतर एक अनोळखी इसम (सर्व रा. साठेनगर, कळंब)
या सर्व आरोपींविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331, 118(2), 118(1), 117(2), 189, 189(4)(2), 191(2), 191(4), 190, 115(2), 325, 351(2), आणि 352 अन्वये दंगल करणे, प्राणघातक हल्ला करणे, प्राण्याची हत्या करणे आणि जिवे मारण्याची धमकी देणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.





