येरमाळा: न्यायालयात सुरू असलेल्या शेतजमीन वादाच्या कारणावरून शेतात गेलेल्या तरुणाला व त्याच्या मित्राला लाकडी काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बावी शिवारातील शेत गट नं. ६४९ मध्ये २१ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी उत्तरेश्वर गोरख कवडे (वय ३०, रा. बावी, ता. वाशी) हे २१ मे रोजी सायंकाळी आपल्या शेत गट नं. ६४९ मध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले होते. या शेतजमिनीबाबत सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. उत्तरेश्वर शेतात असताना तेथे आरोपी व्यंकट शिंदे व रणजित शिंदे आले. त्यावेळी फिर्यादीने त्यांना “माझे शेतीचे प्रकरण कोर्टात चालू असल्याने तुम्ही माझ्या शेतात येऊ नका, येथून निघून जा” असे सांगितले. याचा राग येऊन व्यंकट शिंदे यांनी उत्तरेश्वर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व तेथून निघून गेले.
यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच व्यंकट शिंदे व रणजित शिंदे हे हातात लाकडी काठ्या घेऊन परत आले. व्यंकट शिंदे यांनी उत्तरेश्वर यांच्या डाव्या पायाच्या नडगीवर काठीने मारून मुकामार दिला. तर रणजित शिंदे याने त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर, पाठीवर, तोंडावर मारहाण करून लाथाबुक्क्यांनी तुडवले. याच वेळी तेथे आलेल्या अभयसिंह शिंदे याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर काठीने मारून मुकामार दिला व नखाने ओरखडले, तर विजयसिंह शिंदे याने फिर्यादीला पकडून ठेवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादी उत्तरेश्वर यांचा आरडाओरडा ऐकून जवळच शेळ्या चारत असलेला त्यांचा मित्र शुभम गरड हा भांडण सोडवण्यासाठी धावून आला. त्याला पाहून आरोपी रणजित शिंदे याने “तुझा काय संबंध आहे, तू आमच्या भांडणात पडू नकोस, पडलास तर तुला जीवे मारू” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने शुभमच्या डोक्याच्या उजव्या बाजूला काठीने जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात शुभमच्या डोक्यातून रक्त वाहू लागले.
मारहाणीनंतर जखमी अवस्थेत दोघांनी येरमाळा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, येरमाळा येथे उपचारासाठी पाठवले. उपचार पूर्ण झाल्यानंतर उत्तरेश्वर कवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी व्यंकट शिंदे, रणजित शिंदे (दोघे रा. बावी, ता. वाशी, जि. धाराशिव) आणि अभयसिंह शिंदे, विजयसिंह शिंदे (दोघे रा. कासारवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय तात्या रूपाजी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवराज दगडू घाडगे (बकल नं. १२१८) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




