येरमाळा / वाशी: वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील घोलप कॉम्प्लेक्स आणि ब्रिजच्या खाली जुन्या वादातून दोन गटांत भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडाने तिघांवर प्राणघातक हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी फिर्यादी यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर दगडफेक करून काचा फोडत मोठे नुकसान केले. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात तब्बल १५ जणांविरुद्ध दंगल आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संशयित आरोपींवर झाला गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश ऊर्फ विकी चव्हाण, अक्षय सोमनाथ चव्हाण, अनिकेत पांडुरंग उकरंडे, कृष्णा सतीश कदम, किशोर सतीश कदम, महादेव विठ्ठल घुले, सूरज अरणु अवधूत, कृष्णा कचरे, रमेश जाधव (सर्व रा. तेरखेडा), शिवाजी पोपट जाधवर (रा. रत्नापूर), चैतन्य भगवान येलकर (रा. कडकनाथवाडी), नारायण विलास जाधवर (रा. रत्नापूर), रमाकांत दिगंबर सावंत, कैलास महादेव सावंत आणि पोपट भास्कर लुगडे (सर्व रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित सदाशिव वाघमारे (वय ३०, रा. खामकरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
भरदिवसा दोन ठिकाणी थरार
गेल्या सोमवारी (दि. २५ मे) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रोहित वाघमारे हे विजय सावंत आणि निलेश वाघमारे यांच्यासोबत तेरखेडा येथील घोलप कॉम्प्लेक्स परिसरातून जात होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून वरील सर्व आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना रस्त्यात गाठले.
आरोपींनी रोहित आणि त्यांच्या साथीदारांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडाने त्यांच्यावर सपासप वार केले. हा मारामारीचा थरार घोलप कॉम्प्लेक्स ते तेरखेडा ब्रिजच्या खाली अशा दोन्ही ठिकाणी सुरू होता. या हल्ल्यात तिघेही जण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले.
स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड
मारहाण सुरू असतानाच आरोपींनी तिथे उभ्या असलेल्या रोहित यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर (क्र. MH 12 VC 0090) जोरदार दगडफेक केली. दगडांच्या माऱ्यामुळे गाडीच्या सर्व काचा फुटून गाडीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. “तुम्हाला आज जिवंत सोडत नाही,” अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली होती.
१५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
या गंभीर घटनेनंतर जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर फिर्यादी रोहित वाघमारे यांनी शुक्रवार, दि. २९ मे रोजी येरमाळा पोलीस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार सर्व १५ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ११८(१), १२६(२), १८९(२), १९१(२), ३५२, ३५१(२) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, येरमाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.







