धाराशिव: येथील नियोजन भवनात महाराष्ट्र दिनी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत कृषी विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मागील खरीप हंगामात कृषी निविष्ठांवर तब्बल २२ कोटी रुपये खर्च होऊनही त्याची कोणतीही माहिती देता न आल्याने आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दुसरीकडे, जिल्ह्यात संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र याकडे दुर्लक्ष करत पर्यटन विकासाच्या सादरीकरणाला प्राधान्य दिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
२२ कोटी गेले कुठे?
बैठकीत कृषी विभागाच्या वतीने पीपीटी सादरीकरण सुरू असताना आमदार कैलास पाटील यांनी खरीप २०२५ मध्ये शेतकरी गटांना वितरित केलेल्या कृषी निविष्ठांची सविस्तर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्याकडे मागितली. मात्र, मोरे यांनी ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगताच बैठकीत खळबळ उडाली. ज्या योजनेवर तब्बल २२ कोटी रुपयांचा मोठा निधी खर्च झाला आहे, त्याची साधी माहितीच आढावा बैठकीत उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत, ‘अशा योजना खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का?’ असा खडा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही.
फक्त बियाणे वाटून संपूर्ण किटचे बिल
यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. शेतकरी गटांना कृषी निविष्ठा किटमध्ये केवळ बियाण्यांचे वाटप केले जाते आणि इतर साहित्य न देताच संपूर्ण किटचे बिल मात्र वेळेवर काढले जाते, असा आरोप त्यांनी पालकमंत्र्यांसमोरच केला. भूम येथील एका गोदामात मागील आठवड्यात खरीप हंगामातील बियाण्यांचा साठा आढळून आल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी वितरण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
‘चावडी वाचन’ करण्याची मागणी
शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक योजनेचे ‘चावडी वाचन’ करण्यात यावे, तसेच लाभार्थ्यांच्या याद्या सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. या गोंधळाची दखल घेत, आमदार राणा पाटील यांनी सोमवारपर्यंत शेतकरी गटांना वितरित करण्यात आलेल्या साहित्याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दुष्काळाकडे दुर्लक्ष, पर्यटनाचे ‘प्रेझेंटेशन’
दरम्यान, या महत्त्वाच्या बैठकीत संभाव्य दुष्काळ आणि चारा-पाणी टंचाईसारख्या गंभीर विषयाला मात्र प्रशासनाकडून बगल देण्यात आली. बैठकीच्या शेवटी आमदार कैलास पाटील यांनी ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर आणि मान्सून उशिरा येण्याच्या हवामान विभागाच्या अंदाजामुळे जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या चारा व पाणी टंचाईकडे लक्ष वेधले. यासाठी प्रशासनाने सज्ज राहून तातडीने उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पालकमंत्र्यांनी पर्यटन विकासासंदर्भातील सादरीकरणाला अधिक प्राधान्य दिले. खाजगी कन्सल्टंटकडून पर्यटन प्रकल्पांचे ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ पाहण्यातच बैठकीचा अधिक वेळ खर्ची पडला. परिणामी, चारा व पाणी टंचाईसारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर कोणतीही ठोस चर्चा न झाल्याने, प्रशासनाचे प्राधान्यक्रम नक्की कोणते आहेत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.





