परंडा: शेतातून जाण्याच्या रस्त्याच्या वादावरून एका ३९ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथे घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तिघांवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भैरवनाथ मुरलीधर नरुटे (वय ३९, रा. आवारपिंपरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. तर किसन बलभीम नरुटे, समाधान किसन नरुटे आणि जेजेराम किसन नरुटे (सर्व रा. आवारपिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास आवारपिंपरी येथील शेत गट नं. ३५ च्या बांधाशेजारी हा प्रकार घडला. शेतातून जाण्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी भैरवनाथ नरुटे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी लोखंडी रॉडने आणि चपट्या लोखंडी नळीने मारहाण करून भैरवनाथ यांना गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यानंतर जखमी भैरवनाथ नरुटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी शनिवारी (दि. ७ मार्च) दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध कलम १०९, ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आवारपिंपरी परिसरात खळबळ उडाली आहे.






