धाराशिव : कै. पवनराजे निंबाळकर व त्यांचे वाहनचालक समद काझी यांच्या बहुचर्चित दुहेरी हत्याकांडात मुंबई सत्र न्यायालयाने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींची केलेली निर्दोष मुक्तता आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हानात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मातोश्री आनंदीदेवी निंबाळकर यांनी १८ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, न्यायालयाने याप्रकरणी संबंधित सर्व आरोपींना नोटीसा बजावल्या आहेत.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार – खा. ओमराजे
सत्र न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “सत्र न्यायालयाने निकाल देताना अनेक महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे आणि पुरावे गृहीत धरले नाहीत. उच्च न्यायालयात या सर्व कायदेशीर बाबींचा किस पडणार असून ते मुद्दे आम्ही प्राधान्याने मांडू. पवनराजेंच्या मारेकऱ्यांना कोणतीही माफी नाही आणि न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी सबळ पुराव्यांचा अभाव आणि माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीत आढळलेल्या त्रुटी व विसंगतींच्या आधारे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या निकालामुळे तब्बल २० वर्षांनंतरही ‘पवनराजेंना कोणी व का मारले?’ हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
या आरोपींना मिळाली होती निर्दोष मुक्तता
भादंवि कलम ३०२, १२० (ब) आणि आर्म्स ॲक्ट कलम ३, २५ व २७ अन्वये दाखल गुन्ह्यातून खालील आरोपींची मुक्तता झाली होती, ज्याविरोधात आता अपील करण्यात आले आहे:
-
डॉ. पद्मसिंह पाटील
-
सतीश मंदाडे
-
मोहन शुक्ला
-
पारसमल जैन (माफीचा साक्षीदार)
-
दिनेश तिवारी
-
महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी
-
कैलास यादव
-
ग्यानेंद्र ऊर्फ छोटे पांडे
-
शशिकांत कुलकर्णी
कोठडीचा कालावधी : डॉ. पाटील ३ महिने, तर शूटर तब्बल १५ वर्षे तुरुंगात
या संपूर्ण खटल्यादरम्यान आरोपींच्या कोठडीच्या कालावधीत मोठी तफावत पाहायला मिळाली:
-
डॉ. पद्मसिंह पाटील : ६ जून २००९ रोजी अटक झाल्यानंतर २५ सप्टेंबर २००९ रोजी अलिबाग न्यायालयाने त्यांना २ लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. ते सर्वात कमी काळ म्हणजे ३ महिने १९ दिवस कोठडीत राहिले.
-
दिनेश तिवारी (शूटर) : सर्वाधिक काळ म्हणजे १५ वर्षे ११ महिने न्यायालयीन कोठडीत राहिला.
-
पिंटू सिंग चौधरी (शूटर) : १५ वर्षे १० महिने तुरुंगात घालवले.
-
पारसमल जैन (माफीचा साक्षीदार) : १४ वर्षे ६ महिने कोठडीत राहिला.
दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीमुळे तिवारी आणि चौधरी या दोघांना एप्रिल २०२५ मध्ये जामीन मंजूर झाला होता. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





