धाराशिव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पार वाळून चालले आहे. तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आणि मदतीसाठी आमदारांकडे लागले आहेत. पण आपले तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ‘घरचं झालं थोडं…’ या उक्तीला जागत थेट शेजारचा मतदारसंघ गाठला आहे. स्वतःच्या मतदारसंघातील तुळजापूरचे ११२ आणि धाराशिवचे ७२ गावे वाऱ्यावर सोडून, दादांनी नुकतीच परंडा मतदारसंघातील वाशी तालुक्यातल्या ‘तेरखेडा’ येथे जाऊन बांधावरची पाहणी केली.
आता तेरखेडा येतं परंडा मतदारसंघात आणि परंड्याचे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत! सावंत आणि पाटील यांच्यातील ‘विळ्या-भोपळ्याचे सख्य’ उभ्या धाराशिव जिल्ह्याला माहीत आहे. सावंत पालकमंत्री असताना या दोघांत उडालेले खटके सर्वश्रुत आहेत. आता सावंत यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन राणा पाटलांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केल्याने तानाजीराव चांगलेच संतापले आहेत. “आमच्या मतदारसंघात ही लुडबुड कशासाठी?” असा सवाल सावंत गटातून विचारला जातोय, ज्यामुळे दोघांमधली राजकीय दरी आणखीच रुंदावली आहे.
राणा पाटलांची या दौऱ्याची फेसबुक पोस्ट वाचली की वाटतं, राज्याला वेगळ्या कृषीमंत्र्यांची गरजच काय? “शेतकऱ्यांचे नुकसान केवळ आकडेवारीचा विषय नाही…” असे भावनिक संवाद फेकत त्यांनी तेरखेड्यात मोठा फौजफाटा नेला होता. सोबत आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ, कृषी विस्तार विद्यावेत्ते, कृषी अधिकारी, तलाठी… जणू काही मंत्रिमंडळाची बैठकच तेरखेड्याच्या बांधावर भरली होती! मंत्रीपदाची माळ गळ्यात पडत नसली तरी, ‘फील’ मात्र पूर्ण मंत्री महोदयांचाच घ्यायचा, असा चंगच जणू राणादादांनी बांधला आहे.
मुळात दादांच्या या ‘जिल्हा भ्रमंती’मागे एक वेगळीच राजकीय गोम आहे. त्यांचे कट्टर राजकीय वैरी, खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटात आल्यापासून संपूर्ण जिल्हाभर सक्रिय झाले आहेत. ओमराजेंना मिळणारा प्रतिसाद पाहून राणा पाटलांनाही आता आपला मतदारसंघ सोडून इतरत्र फिरण्याची हुक्की आली आहे. मग तो ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा धाराशिव-कळंब मतदारसंघ असो, किंवा सावंतांचा परंडा; जिथे संधी मिळेल तिथे दादांची लुडबुड चालू आहे.
थोडक्यात काय, तर स्वतःच्या घरात आग लागली असताना शेजाऱ्याच्या गोठ्यावर पाणी मारण्याचा हा प्रकार आहे. तुळजापूरचा शेतकरी विचारतोय, “आमदार साहेब, आमच्या वाळलेल्या सोयाबीनचं काय?” पण दादा सध्या ओमराजे आणि तानाजी सावंतांना शह देण्यासाठी ‘शॅडो मिनिस्टर’च्या भूमिकेत इतके गर्क आहेत, की त्यांना तुळजापूरचा रस्ताच विसरल्यासारखा झाला आहे.






