भूम : एका सोन्याच्या अंगठीतून दोन सोन्याच्या अंगठ्या बनवून देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका ७६ वर्षीय वृद्धाची तब्बल ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना भूम बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
माणिक नरहरी जोगदंड (वय ७६, रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव) हे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास भूम बसस्थानक आवारात आपल्या गावाकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत बसले होते. यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी जोगदंड यांना बोलण्यात गुंतवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी दिल्यास, त्यातून दोन सोन्याच्या अंगठ्या बनवून देतो, असे आमिष दाखवले.
भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून जोगदंड यांनी आपली ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी त्यांना दिली. मात्र, अंगठी घेतल्यानंतर या दोन्ही अनोळखी इसमांनी वृद्धाची दिशाभूल करून तेथून पोबारा केला. आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यावर वृद्धाला धक्काच बसला.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर, माणिक जोगदंड यांनी सोमवारी, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी भूम पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) ४० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी पळवणाऱ्या दोन अनोळखी भामट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भूम पोलीस बसस्थानकातील सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपींचा शोध घेत आहेत.






