आंबी: तलावात मासे पकडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर तलवारी, लोखंडी रॉड आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे घडली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी सहा जणांविरुद्ध आंबी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी आणि शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवणनाथ लिंबा भोसले (वय ४४, रा. ताकमोडवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खंडेश्वरवाडी येथील मत्स्य मध्यम प्रकल्पाच्या तलावावर ही घटना घडली. तलावात मासे पकडण्याच्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी रेवणनाथ भोसले यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी त्यांच्यावर तलवार, लोखंडी रॉड आणि दगडाने प्राणघातक हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या सततच्या उपचारांनंतर आणि घटनेच्या धक्क्यातून सावरल्यानंतर रेवणनाथ भोसले यांनी ९ मे २०२६ रोजी आंबी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
फिर्यादीवरून पोलिसांनी रोहीत वासुदेव लष्कर, विशाल वासुदेव लष्कर, वासुदेव नवनाथ लष्कर, बाळू नवनाथ लष्कर, विष्णू महादेव पवार आणि सुजित सुखदेव लष्कर (सर्व रा. खंडेश्वरवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव) यांच्यावर आंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), ३५२, ३५१(२)(३) सह आर्म अॅक्ट ४/२५ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.




