येरमाळा : लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने, विनापरवाना बेकायदेशीररित्या लोखंडी तलवार जवळ बाळगल्याप्रकरणी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील तिघांवर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. १६) मध्यरात्रीच्या सुमारास बसस्थानकाजवळील पुलाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
रेहान हारुण सय्यद (वय १९), मोहसीन शब्बीर सय्यद (वय ३१) आणि अब्दुल हारुण सय्यद (वय २१, सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १६ एप्रिल २०२६) रात्री ११.१० वाजेच्या (२३.१० वा.) सुमारास तेरखेडा येथील ब्रिजखाली व बसस्थानकाजवळ काही तरुण संशयितरित्या थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी पाहणी केली असता, वरील तिन्ही आरोपी विनापरवाना व बेकायदेशीररित्या एक लोखंडी तलवार स्वतःजवळ बाळगून असल्याचे आढळून आले. हे कृत्य लोकांच्या जिवितास धोका निर्माण करणारे असल्याने पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.
पोलीस पथकाने त्यांच्याकडून अंदाजे ५०० रुपये किमतीची ती लोखंडी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी संदेश पंडित क्षीरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून (फिर्यादीवरून) येरमाळा पोलीस ठाण्यात वरील तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम ४ आणि २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा (मपोका) कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.







