धाराशिव: कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवी, श्री क्षेत्र तुळजापूर, येथील महिला भगिनी आणि पुजारी वर्गाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, या बदनामीस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तुळजापूर शहरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात, नागरिकांनी एकत्र येत शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी आणि पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना निवेदन सादर केले.
काय आहे प्रकरण?
निवेदनानुसार, १४ फेब्रुवारी रोजी तुळजापूर पोलिसांनी तामलवाडी येथे ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न उधळून लावला होता. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तपास करत मुंबईपर्यंतचे धागेदोरे शोधून काढले आहेत. मात्र, काही माध्यमकर्मी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा आधार घेत तुळजापूर शहर, येथील महिला भगिनी आणि पुजारी वर्गाची जाणीवपूर्वक बदनामी सुरू केली आहे. तथ्यहीन आणि अवमानकारक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करून तीर्थक्षेत्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
बदनामीचे टप्पे आणि आरोप:
- युवकांची बदनामी: सुरुवातीला, तुळजापूर शहरातील दीड ते दोन हजार युवक ड्रग्ज सेवन करत असल्याची खोटी माहिती पसरवण्यात आली, ज्यामुळे निष्पाप युवकांची नाहक बदनामी झाली व त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण झाली.
- महिला भगिनींचा अपमान: त्यानंतर, “लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तुळजापुरात ड्रग्जचा सर्रास वापर होतो” अशा आशयाच्या खोडसाळ बातम्या पसरवून शहरातील माता-भगिनींबद्दल अत्यंत संतापजनक आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला. हा शहरातील समस्त मातृशक्तीचा विनयभंग असल्याचा दावा निवेदनात केला आहे.
- पुजारी वर्गावर निशाणा: ७ एप्रिल रोजी “आदेश- ड्रग्ज तस्करीतील आरोपी पुजाऱ्यांवर होणार ही कारवाई” अशा मथळ्याखाली वृत्त पसरवले गेले. मात्र, मंदिर प्रशासनाने असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट, ड्रग्ज प्रकरणात पुजारी मंडळांनीच कारवाईसाठी पुढाकार घेतला होता, तरीही त्यांची बदनामी केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांची मागणी:
गेल्या दोन महिन्यांपासून काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवून, निवेदनं देऊन, पत्रकार परिषदा घेऊन आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रियांद्वारे हे प्रकरण चर्चेत ठेवत आहेत. हा कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तीर्थक्षेत्र तुळजापूर आणि पुजारी वर्गाच्या बदनामीचा एक व्यापक कट असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या बदनामीकारक प्रकरणामागे कोण आहे, त्यांना कोण पाठबळ देत आहे, हा ‘पेड न्यूज’चा प्रकार आहे का, याची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सॲप कॉल आणि आर्थिक व्यवहार तपासून या षडयंत्राचा छडा लावावा आणि दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
या निवेदनावर सचिन रोचकरी, निलेश रोचकरी, आनंद कंदले, शांताराम पेंदे, संदीप गांगणे, राजेश्वर कदम, बाळासाहेब भोसले, नानासाहेब डोंगरे, रत्नदीप भोसले, लखन पेंदे, रामचंद्र रोचकरी, इंद्रजीत साळुंके यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.