तुळजापूर: शहरातील मातंगनगर भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत विटा, लाकडी फळी, रॉड आणि दगडांचा वापर करण्यात आला असून, दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकमेकांना मारहाण केली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण १२ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंकडून फिर्याद दाखल करण्यात आली.
पहिली फिर्याद (फिर्यादी: योजना बालाजी धावारे)
योजना धावारे (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाच्या रागातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, विटेने आणि लाकडी फळीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
-
आरोपी: बाळू बबन धावारे, मनोज बाळू धावारे, श्रीरंग कटारे, चैताली श्रीरंग कटारे, वनिता बाळू धावारे आणि आशा राहुल गायकवाड.
दुसरी फिर्याद (फिर्यादी: वनिता बाळू धावारे)
वनिता धावारे (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विरोधी गटाने जुन्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना शिवीगाळ केली. आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड, बकेट आणि दगडाने मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
-
आरोपी: अरविंद बबन धावारे, प्रथमेश बालाजी धावारे, अनेश अरविंद धावारे, स्वामी अरविंद धावारे, निकीता प्रथमेश धावारे आणि योजना बालाजी धावारे.
दोन्ही गटांविरुद्ध तुळजापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(१), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.







