धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 28 जून रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून दुपारी 4 वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
धाराशिवच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय जाहीर केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे थेट धाराशिवमध्ये येऊन कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
28 जून रोजी होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरे हे पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्याचा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न या सभेतून केला जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे धाराशिवमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे लक्षही या सभेकडे लागले आहे. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.






