तुळजापूर – शहरातील शुक्रवार पेठेत मागील दाखल असलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून एका ४० वर्षीय महिलेला व तिच्या मुलीला दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी, ८ एप्रिल रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या वैद्यकीय जबाबानुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शुभांगी भवानीशंकर कनकधर (वय ४० वर्षे, रा. खटकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खटकाळ गल्ली येथे आरोपी लक्ष्मीनारायण नागनाथ कनकधर (वय ४६) आणि सुप्रिया लक्ष्मीनारायण नागनाथ कनकधर (वय ३८) (दोघे रा. गौरव कॉलनी, तुळजापूर) यांनी फिर्यादी शुभांगी व त्यांची मुलगी श्वेतांबरी यांना गाठले.
आरोपींनी शुभांगी यांना ‘मागील केस मागे घे’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी मिळून शुभांगी व श्वेतांबरी यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकीही दिली, असे पीडित महिलेने वैद्यकीय जबाबात म्हटले आहे.
या वैद्यकीय जबाबावरून तुळजापूर पोलिसांनी आरोपी लक्ष्मीनारायण कनकधर व सुप्रिया कनकधर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.