धाराशिव- शेतजमिनीच्या हद्द कायम मोजणीनंतर हद्दीच्या खुणा करण्यासाठी शेतकऱ्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना कळंब येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार (वर्ग-३) राजू गंगाराम काळे (वय ५४ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), धाराशिवच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई कळंब शहरातील शिवाजी चौक परिसरात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या गट नं. २३९ मधील शेतजमिनीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी कळंब येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार राजू काळे (रा. आशीर्वाद नगर, अंबड रोड, जालना) यांनी ८ मे २०२५ रोजी संबंधित शेतजमिनीची मोजणी केली. मोजणी पूर्ण झाल्यानंतर हद्दीच्या कायमस्वरूपी खुणा करण्यासाठी काळे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
या प्रकारानंतर पीडित शेतकऱ्याने ८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव युनिटकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने ९ मे रोजी कळंब येथील शिवाजी चौकात सापळा रचून लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी राजू काळे यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीअंती ३ हजार रुपये पहिला हप्ता म्हणून स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान, तक्रारदार शेतकऱ्याकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजू काळे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी काळे याच्या अंगझडतीत लाचेची रक्कम ३ हजार रुपये, त्याव्यतिरिक्त ७,६२० रुपये रोख रक्कम, एक ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तक्रारदाराच्या शेत मोजणीची फाईल, एक व्हिवो कंपनीचा मोबाईल आणि एक असूस कंपनीचा लॅपटॉप आढळून आला व तो जप्त करण्यात आला आहे.
आरोपी राजू काळे याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याला अटक करण्यात आले आहे. तसेच, आरोपीच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू असून, त्याचा मोबाईल फोन पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली, धाराशिव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सिद्धेश्वर तावसकर, शशिकांत हजारे, आशिष पाटील, जाकेर काझी यांनी पार पाडली.
भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवा
कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारासंबंधित तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. तसेच, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर (मोबाईल क्र. ९९२३०२३३६१) किंवा पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव (मोबाईल क्र. ९५९४६५८६८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.