वाशी : सोनारवाडी (ता. वाशी) येथील शेतकऱ्यांकडून १३ लाख २७ हजार रुपयांचे सोयाबीन खरेदी करून, पैसे न देता फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बार्शी येथील दोन व्यापाऱ्यांविरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भाऊराव मोरे आणि मन्नत रामलिंग तोडकरी (दोघेही रा. बार्शी, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी २८ डिसेंबर २०२४ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत सोनारवाडी येथील शेतकरी नारायण वैजीनाथ घोळवे (वय ६८) व इतर शेतकऱ्यांकडून सोयाबीनचे ५५२ कट्टे खरेदी केले.
या मालाची एकूण किंमत १३,२७,८६३ रुपये होती. मालाचे पैसे काही दिवसांत देतो, असे आश्वासन देऊन या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यानंतर त्यांनी पैसे न देता सोयाबीन घेऊन जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली व विश्वासघात केला.
वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने अखेर नारायण घोळवे यांनी गुरुवारी, १२ जून २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप मोरे आणि मन्नत तोडकरी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.