धाराशिव: सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाजात डॉल्बी आणि डीजे वाजवणाऱ्या चालकांना धाराशिव शहर पोलिसांनी आणि न्यायालयाने जबर दणका दिला आहे. न्यायालयाने जप्त केलेल्या चार डॉल्बी वाहनांना तब्बल ४० लाखांच्या हमीपत्रावर (Bond) सोडण्याचे आदेश दिले आहेत, तर आरटीओने या वाहनांना ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील डॉल्बी चालकांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय?
धाराशिव शहरात ६ जानेवारी २०२६ रोजी हजरत खॉजा शमशोद्दीन गाजी (रहे) यांच्या उरसानिमित्त मोठ्या प्रमाणावर मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यावेळी डॉल्बी आणि डीजे चालकांनी आवाजाची मर्यादा ओलांडून शहरात प्रचंड दणदणाट केला. यामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या प्रकाराची गंभीर दखल घेत धाराशिव शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ६ वाहनांवर गुन्हे दाखल केले होते.
न्यायालय आणि आरटीओचा दणका:
पोलिसांनी जप्त केलेली वाहने सोडण्यासाठी संबंधित मालकांनी न्यायालयात धाव घेतली असता, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर. डी. गायकवाड यांनी कडक अटी घातल्या.
-
न्यायालयाचा आदेश: ४ डॉल्बी वाहनांना प्रत्येकी १० लाख रुपये, याप्रमाणे एकूण ४० लाख रुपयांच्या हमीपत्रावर (Bond) सोडण्याचे आदेश दिले.
-
कडक अटी: ही वाहने यापुढे कोणालाही विकता येणार नाहीत, त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि न्यायालयाने आदेश दिल्यास ती पुन्हा हजर करावी लागतील, अशा कडक शर्तींवर ही वाहने तात्पुरती सोडण्यात आली आहेत.
-
आरटीओ दंड: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने (RTO) या चारही वाहनांना मिळून ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गुन्हा दाखल झालेले वाहन मालक:
१. प्रणव राजेंद्र तांबे (रा. सातारा) – टाटा टेम्पो (एम.एच.११ टी – ५५२५)
२. सौरभ सुरेश खामकर (रा. शिरुर, पुणे) – टाटा ट्रक (एम.एच. ११ ए.एल. – ०७१९)
३. गणेश रामदास मिरगी (रा. सातारा) – टाटा ट्रक (एम.एच. ११ बी.एल. – ७४७५)
४. संतोष किसन मेघावत (रा. पुणे) – टाटा ट्रक (एम.एच. ४६ ई – १४८४)
तसेच साऊंड सिस्टम चालक सागर संभाजी शिंदे (रा. कोल्हापूर) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी:
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे धाराशिव शहरात यापुढे कर्णकर्कश डॉल्बी वाजणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.







