तुळजापूर : स्वतःचा कांदा मध्यस्थांमार्फत न विकता परस्पर विकल्याच्या रागातून एका २७ वर्षीय तरुणावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी येथे घडली. शनिवारी (ता. १४) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रविवारी (ता. १५) तुळजापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास बापू गंधोरे (वय २७, रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वैद्यकीय जबाबावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गंधोरे हे आपला कांदा आरोपींच्या माध्यमातून न विकता स्वतः परस्पर विक्री करत होते. याचाच राग आरोपी किरण दयानंद चितळे आणि रवी दयानंद चितळे (दोघेही रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर) यांच्या मनात होता.
याच कारणावरून शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपींनी विकास यांना अमृतवाडी येथे गाठले. त्यांना शिवीगाळ करत सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपींनी थेट तलवार आणि कोयत्याने वार करून विकास यांना गंभीर जखमी केले.
या हल्ल्यानंतर जखमी विकास गंधोरे यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांनी रविवारी (ता. १५) पोलिसांना दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून तुळजापूर पोलिस ठाण्यात किरण चितळे आणि रवी चितळे या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ३(५) सह भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.





