धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत महायुतीने चारही जागांवर आपला झेंडा फडकवला. सातारा जिल्हा परिषदेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या निवडणुकीत चक्क खाजगी बाऊन्सर्सचा मोठा गराडा पाहायला मिळाला.
नुकत्याच धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ४५ विरुद्ध १० असा एकतर्फी सामना रंगला होता. यामध्ये अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषाताई गायकवाड यांची निवड झाली होती. या निवडीनंतर आज सभापती पदांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
असे झाले सत्तावाटप
वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महायुतीमध्ये सभापती पदासाठी २:१:१ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. त्यानुसार भाजपला दोन, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक सभापती पद देण्यात आले.
-
भाजप: सिद्धेश्वर कोरे (अर्थ आणि बांधकाम )आणि विश्वास कोकणे ( समाजकल्याण )
-
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): भाऊसाहेब खरतडे ( कृषी आणि पशुसंवर्धन )
-
शिवसेना (शिंदे गट): पूजा शिंदे (महिला आणि बालविकास सभापती)
सुरुवातीला महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी सभापती पदावर प्रबळ दावेदारी सांगितली होती. त्यातच महाविकास आघाडीनेही आपले उमेदवार उभे केल्यामुळे ही निवडणूक अत्यंत रंजक आणि चुरशीची झाली होती. मात्र, महायुतीने एकजूट दाखवत सर्व जागा जिंकल्या. निवडीनंतर बोलताना सदस्यांनी सांगितले की, “योग्य उमेदवाराला संधी मिळाली आहे, आमच्यात कोणताही वाद नाही. महायुती म्हणून आम्ही निवडून आलो आणि महायुती म्हणूनच काम करू.”
सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर्स तैनात:
अलीकडेच सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकीय गोंधळ पाहायला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा परिषद सभापती निवडीत मोठी खबरदारी घेण्यात आली होती. जिल्हा परिषद सदस्यांच्या सुरक्षेसाठी थेट खाजगी बाऊन्सर्स तैनात करण्यात आले होते. पुणे आणि सोलापूर येथून विशेष बाऊन्सर्स मागवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला बाऊन्सर्सचाही समावेश होता. यामुळे जिल्हा परिषद आवारात छावणीचे स्वरूप आले होते.
पक्षप्रवेश करूनही पदरी निराशाच
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एक लक्षवेधी बाब समोर आली आहे. माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या सत्तावाटपात सावंत यांच्या पदरी निराशाच पडली असून त्यांना कोणतेही पद मिळालेले नाही.तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे यांना देखील पदापासून वंचित राहावे लागले.





