धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेत भाजपचे नेते आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले असून, अध्यक्षपदी असलेल्या स्वतःच्या पत्नी अर्चना पाटील यांना ‘वन हँड’ कारभार करता यावा यासाठी सर्व ‘नवख्या’ सदस्यांची सभापतीपदी वर्णी लावली आहे. या खेळीमुळे भाजपमधील दिग्गज नेत्यांसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार गट) मोठी नाराजी उफाळून आली आहे.
राणा पाटलांचा ‘मास्टरस्ट्रोक’; अनुभवी नेत्यांना डावलून नवख्यांना संधी
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अर्चना पाटील (भाजप) यांची अध्यक्षपदी तर उषाताई गायकवाड (शिवसेना) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. अध्यक्ष असलेल्या पत्नीच्या कारभारात दुसऱ्या कोणत्याही अनुभवी नेत्याचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी आ. राणा पाटील यांनी खेळी करत नव्यानेच निवडून आलेल्या आणि पहिल्यांदाच झेडपीत गेलेल्या सदस्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ टाकली आहे.
सभापती निवडीचे सूत्र आणि छुपे राजकीय अर्थ:
वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महायुतीमध्ये भाजपला दोन, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक सभापती पद देण्यात आले.
-
शिवसेनेला (शिंदे गट) ‘डच्चू’: शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या महिला आणि बालविकास सभापती पदावर पूजा शिंदे (डिकसळ) यांची वर्णी लागली. मात्र, पूजा शिंदे यांचे पती तुषार शिंदे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आ. राणा पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात. त्यामुळे शिवसेनेला खऱ्या अर्थाने या निवडीत डावलले गेल्याची चर्चा आहे.
-
राष्ट्रवादीत (अजित पवार गट) नात्याचा गोतवळा: राष्ट्रवादीच्या कोट्यातून भाऊसाहेब खरतडे यांना संधी मिळाली. खरतडे हे माजी आमदार राहुल मोटे यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत, आणि राहुल मोटे हे आ. राणा पाटील यांच्या आत्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदही अप्रत्यक्षपणे राणा पाटील यांच्याच नियंत्रणात गेल्याचे बोलले जात आहे.
-
भाजप: सिद्धेश्वर कोरे आणि विश्वास कोकणे या नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजप आणि मित्रपक्षांतील दिग्गजांना डावलल्याने खदखद
या निवडीमध्ये भाजपचे दिग्गज नेते बसवराज पाटील, सुनील चव्हाण, सुजितसिंह ठाकूर आणि अभय चालुक्य यांच्या गटाला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे अभय चालुक्य यांनी दोन अपक्ष सदस्यांना भाजपमध्ये आणूनही त्यांच्या गटाला पदरी निराशाच पडली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे आणि सुरेश बिराजदार हे दिग्गज नेतेही या निवडीमुळे नाराज आहेत. तसेच, शिवसेना शिंदे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनाही काहीच मिळाले नसल्याने असंतोष वाढला आहे.
सोशल मीडियावर नाराजीचा भडका; ‘तनाने शिवसेना, मनाने भाजप’
या राजकीय घडामोडींनंतर शिवसेना शिंदे गटातील नाराजी सोशल मीडियावर उघडपणे समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सूरज साळुंके यांची फेसबुक पोस्ट सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उपहासात्मक टोला लगावताना लिहिले आहे की, “तनाने शिवसेना आणि मनाने भाजपमध्ये असलेल्या शिवसेनेच्या महिला आणि बालकल्याण सभापती पूजाताई शिंदे यांना हार्दिक शुभेच्छा.“ तर, शिवसेना शिंदे गटाचेच आनंद शिंदे पाटील केवळ “जय महाराष्ट्र“ असे सूचक विधान लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दुपारी १२.२० वाजेपर्यंत नाव निश्चित, तरीही ऐनवेळी ‘गेम’! आनंद पाटलांचा सणसणाटी आरोप
या सर्व राजकीय नाट्यात ऐनवेळी मोठा ‘गेम’ झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे सभापती कोणाला करायचे? या संदर्भात तुळजापूर येथील ‘स्कायलंड’ हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी १० वाजल्यापासून सुरू होती. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी, आ. प्रा.तानाजी सावंत यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील यांना सभापती करण्याचे आदेश होते.
ही बैठक दुपारी १२.२० वाजेपर्यंत चालली. बैठक संपेपर्यंत नाव निश्चित असल्यामुळे पाटील यांनी जल्लोषाची जय्यत तयारीही केली होती. त्यासाठी स्वतः आनंद पाटील यांनी आपल्या मातोश्रीचा सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज देखील घेतला होता. मात्र, अर्ज भरण्यास ऐनवेळी खोडा घातल्यामुळे त्यांची सभापतीपदाची संधी हुकली. ही संधी हुकली नव्हे, तर जाणूनबुजून ‘मॅनेजिंग आयात कंपनीने’ हुकवली असल्याचा सणसणाटी आरोप आनंद पाटील यांनी केला आहे. आपण शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे महायुतीमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.





