धाराशिव: शाळेतील वर्गपाठाची (क्लास वर्क) वही सोबत न आणल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका १३ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जाधववाडी रोडवरील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे बुधवारी (१ एप्रिल) हा प्रकार घडला असून, याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषराज गोपाळ कोळी (वय १३) असे मारहाण झालेल्या जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याचे वडील गोपाळ नारायण कोळी (वय ४०, रा. साईरामनगर, धाराशिव) यांनी गुरुवारी (२ एप्रिल) शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनिषराज हा जाधववाडी रोडवरील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे शिक्षण घेत आहे. १ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळेत असताना, त्याने शाळेची वर्गबुक वही आणली नाही, या कारणावरून शाळेतील शिक्षक जाधव (पूर्ण नाव अद्याप निष्पन्न नाही) यांनी रागाच्या भरात मनिषराजला लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याच्या उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर, पाठीवर आणि डाव्या पिंडरीवर काठीने बेदम मारहाण करून त्याला जखमी केले.
मुलाला झालेल्या या मारहाणीनंतर वडील गोपाळ कोळी यांनी धाराशिव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक दराडे यांच्या आदेशान्वये, आरोपी शिक्षक जाधव याच्याविरुद्ध गुरनं ११६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम ११८ (१) सह बाल न्याय कायदा २०१५ चे कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गाढवे हे करत आहेत. क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण झाल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.









