ढोकी: शेतात काढून ठेवलेल्या राजमा पिकाच्या गंजीला (गनिम) तसेच शेती साहित्याला आग लावून तब्बल २ लाख रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जागजी शिवारात घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. २३) ढोकी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिवाजी गायकवाड (वय ४२, मूळ रा. गुंफावाडी, सध्या रा. पारुनगर, मुरुड, जि. लातूर) असे नुकसान झालेल्या फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. सचिन गायकवाड यांची जागजी शिवारात शेती असून, त्यांनी शेतात राजमा पिकाची गंज लावून ठेवली होती. पावसापासून किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी त्यांनी त्यावर स्पिंकलरचे दहा पाईप आणि दोन ताडपत्रीसह इतर साहित्य ठेवले होते.
दरम्यान, बुधवार (दि. २२) रात्री १० ते गुरुवार (दि. २३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपी संदीप शिवाजी गायकवाड (रा. गुंफावाडी, ता. जि. लातूर) याने त्यांच्या शेतातील राजमा पिकाच्या गंजीला आग लावली. या भीषण आगीत राजमा पीक, स्पिंकलरचे दहा पाईप, दोन ताडपत्री आणि इतर साहित्य जळून खाक झाले. यात सचिन गायकवाड यांचे तब्बल २ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर सचिन गायकवाड यांनी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रथम खबर दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी संदीप शिवाजी गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६ (एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.






