धाराशिव : जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांची कोंडी करत अंधारात पुन्हा एकदा बंद केलेला समतानगरचा रस्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘शिवसेना स्टाईल’ने मोकळा केला आहे. पंचायत समिती गेट ते समतानगर जाणारा हा १२ मीटर रुंदीचा रस्ता पहाटेच्या वेळी काटेरी कुंपण आणि सिमेंट पोल रोवून बंद करण्यात आला होता. मात्र, शिवसैनिकांनी हे कुंपण उखडून फेकत सर्वसामान्यांसाठी हा रस्ता पूर्ववत खुला करून प्रशासनाला सणसणीत चपराक लगावली आहे.
काय आहे नेमका घटनाक्रम?
धाराशिव नगर परिषद हद्दीतील, जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा हा रस्ता गेल्या ४० – ५० वर्षांपासून नागरिकांच्या वहिवाटीचा आहे. हजारो नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना रुग्णालये, बँका आणि शासकीय कार्यालयात जाण्यासाठी हा सर्वात जवळचा आणि सोयीचा रस्ता आहे. असे असताना, २५ मार्च रोजी अचानक जि.प. प्रशासनाने हा रस्ता बंद करण्याची आगळीक केली.
या मनमानीविरोधात २७ मार्च रोजी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने नमते घेत हा रस्ता तात्काळ खुला केला होता. मात्र, प्रशासनाने आपला आडमुठेपणा सोडला नाही. २२ एप्रिल रोजी रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा या रस्त्यावर काटेरी कुंपण घालून तो बंद करण्यात आला. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती, ज्याचा उद्रेक आज कुंपण तोडण्यात झाला.
१ कोटी ३० हजारांचा निधी मंजूर, मग रस्ता बंद का?
या संपूर्ण प्रकरणात संशयाची सुई प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जाते. कारण, याच रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडून तब्बल १ कोटी ३० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर असतानाही रस्ता तयार करण्याऐवजी तो वारंवार बंद करण्याचा हेतू काय? हा रस्ता बंद करण्यासाठी जि.प. प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे? सर्वसामान्यांची अडवणूक करून कोणाचे हित साधले जात आहे? असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत.
तर पुन्हा ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देऊ – ठाकरे गट
“ज्या-ज्या वेळी जिल्हा परिषद प्रशासन दडपशाही करून हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करेल, त्या-त्या वेळी नागरिकांच्या हक्कासाठी ‘शिवसेना स्टाईल’नेच रस्ता खुला केला जाईल,” असा सज्जड इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.
या धडक कारवाईवेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक नाना घाडगे, पंकज पाटील, अमित उंबरे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, मनोज उंबरे, सागर मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







