धाराशिव : विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटना आणि ‘डीएस ग्रुप’च्या वतीने आयोजित भव्य मिरवणुकीने धाराशिव नगरी दुमदुमून गेली. या उत्सवात मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती आणि हभप, भन्तेजी, मौलाना यांच्यासह अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांचा लक्षणीय सहभाग हे यंदाच्या जयंती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.


बुधवारी (दि. २२) सायंकाळी शहरातील क्रांती चौक (भीमनगर) येथून पारंपारिक वाद्यांच्या गजरात या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापुरुषांना अभिवादन करून पुन्हा क्रांती चौक येथे विसर्जित करण्यात आली. या अत्यंत शिस्तबद्ध मिरवणुकीने संपूर्ण धाराशिवकरांचे लक्ष वेधून घेतले. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.
सर्वधर्मसमभावाचे दर्शन
गेल्या २५ वर्षांपासून अठरापगड जाती-समूहांना एकत्रित करण्याचे महत्त्वपूर्ण काम बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे करत आहेत. यंदाही सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद देऊन त्यांनी एक नवा आदर्श प्रस्थापित केला.
या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी (सरपंच, सांजा), जातमुक्त गाव करणारे सौंदाळाचे सरपंच शरद आरगडे पाटील, सुधीर पवार, विशाल शिंगाडे यांच्यासह हभप प्रकाश बोधले महाराज, हभप धनंजय महाराज सांजेकर, भन्ते सुमेधजी नागसेन, भन्ते विनीत धम्म, मौलाना अय्युब कासमी, मौलाना जाफर खानसाब आदी विविध धर्मांचे धर्मगुरू व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जरांगे पाटील यांनी दलित-बहुजनांचे नेतृत्व करावे


उत्सव सोहळ्यादरम्यान भन्तेजी, मौलाना आणि हभप यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचा शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सरपंच शरद आरगडे पाटील व अधीक्षक अभियंता संजय आडे यांचाही समितीच्या वतीने सत्कार झाला. प्रास्ताविकात धनंजय शिंगाडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत, ‘मनोज जरांगे पाटील यांनी दलित बहुजन समाजाचे नेतृत्व करावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली. हभप प्रकाश महाराज बोधले, मौलाना जाफर महंमदअली खान आणि भन्ते सुमेधजी नागसेन यांनी उपस्थितांना आशीर्वचन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी केले, तर कार्याध्यक्ष सुधीर पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अन्यायाची जाणीव झाली तरच अन्याय दूर होईल : मनोज जरांगे पाटील
“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांचा आदर केला. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन मी समाजासाठी मैदानात उतरलो आहे. समाजातील सर्व घटकांना आपल्यावरील अन्यायाची जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला तरच अन्याय दूर होईल. आपल्यावर झालेल्या अन्यायाला दूर करायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लढ्याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे,” असे परखड मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
धाराशिवमध्ये जंगी स्वागत
धाराशिव शहरात मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.






