सत्तेची हवा एकदा का डोक्यात गेली की, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या तालावर नाचणारे प्रशासन जनतेला कसे वेठीस धरतात, याचा अत्यंत संतापजनक आणि निर्लज्ज नमुना सध्या धाराशिवमध्ये पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनतेने विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली. मात्र, या सत्तेचे रूपांतर आता हुकूमशाही आणि दांडेलशाहीत झाले असून, नागरिकांना आपण यांना निवडून देऊन मोठी चूक तर केली नाही ना? असा पश्चाताप होऊ लागला आहे. ४० ते ५० वर्षे जुना, सर्वसामान्यांच्या रोजच्या वहिवाटीचा रस्ता रात्रीच्या अंधारात काटेरी कुंपण लावून बंद करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रताप हा केवळ सत्तेचा माजच दर्शवतो.
रस्ता जनतेचा, मग ‘साक्षात्कार’ अध्यक्षांना कसा?
धाराशिव पंचायत समिती गेट ते समतानगरकडे जाणारा हा रस्ता काही आजचा नाही. तब्बल चार दशकांहून अधिक काळ हजारो नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी या रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, रुग्णालये आणि बँकांमध्ये ये-जा करत आहेत. शहराचा हा एक अत्यंत महत्त्वाचा ‘शॉर्टकट’ आहे. असे असताना, हा रस्ता अचानक जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याचा ‘साक्षात्कार’ जि.प. अध्यक्षा अर्चना पाटील यांना कसा झाला?
सर्वांत संतापजनक बाब म्हणजे प्रशासनाची कार्यपद्धती! दिवसाढवळ्या जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत नसलेले प्रशासन रात्रीच्या अंधारात, चोरांसारखे येून रस्त्यावर सिमेंटचे पोल रोवते आणि काटेरी कुंपण घालते. अवघ्या पंधरा दिवसांत प्रशासनाने हा निर्लज्जपणा दुसऱ्यांदा केला आहे. ही कोणती लोकशाही? हा कुठला कारभार?
मंजूर झालेला १ कोटी ३० लाखांचा निधी गेला कुठे?
या संपूर्ण प्रकरणात केवळ दडपशाहीच नाही, तर मोठा भ्रष्टाचार आणि संगनमताचा वास येत आहे.
-
निधीचा खेळ: याच समतानगरच्या रस्त्यासाठी तब्बल १ कोटी ३० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
-
नेमकी माशी कुठे शिंकली? जर रस्ता बनवण्यासाठी निधी मंजूर आहे, तर रस्ता तयार करण्याऐवजी तो बंद का केला जात आहे?
-
छुपे हितसंबंध: हा रस्ता बंद करून प्रशासनाला नेमके कोणाचे खिसे भरायचे आहेत? की यामागे भूमाफियांचे काही छुपे हितसंबंध दडले आहेत?
मंजूर झालेला निधी अचानक गायब होतो आणि लोकांचा रस्ता बंद केला जातो, या प्रश्नाचे उत्तर द्यायला ना जि.प. अध्यक्ष तयार आहेत, ना मुजोर झालेले अधिकारी!
ठाकरे गटाची ‘शिवसेना स्टाईल’ चपराक!


जेव्हा प्रशासन बहिरे होते आणि लोकप्रतिनिधी मुजोर होतात, तेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जे काटेरी कुंपण आणि पोल उखडून फेकले, ती केवळ एक कृती नव्हती, तर ती प्रशासनाच्या मनमानी कानशिलात लगावलेली सणसणीत चपराक होती.
युवासेना आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारून आणि स्वतः रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांसाठी जो मार्ग मोकळा केला, त्यातून प्रशासनाने धडा घेण्याची गरज आहे. “प्रशासन जेवढ्या वेळा दडपशाही करेल, तेवढ्या वेळा ‘शिवसेना स्टाईल’ने रस्ता खुला केला जाईल,” हा इशारा सत्तेच्या धुंदीत असणाऱ्यांनी हलक्यात घेऊ नये.
सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा
लोकांनी अत्यंत विश्वासाने नगर परिषदेपाठोपाठ जिल्हा परिषदेची सत्ता आ. राणा पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील गटाच्या हाती दिली होती. शहराचा विकास होईल, न्याय मिळेल ही भाबडी आशा त्यामागे होती. पण आज चित्र उलटे आहे. विकासकामे तर दूर, पण आहे ते रस्ते हिरावून घेण्याचे पाप सत्ताधारी करत आहेत.
हे प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी कान उघडून ऐकावे: सत्ता ही कोणाचीही मक्तेदारी नसते. आज ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर बसवले आहे, तीच जनता उद्या तुमची हुकूमशाही खपवून न घेता तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचायला मागेपुढे पाहणार नाही. अंधारात काटेरी कुंपणे उभारून जनतेची अडवणूक थांबवा, अन्यथा येणाऱ्या काळात जनता तुमच्या राजकीय अस्तित्वालाच कुंपण घातल्याशिवाय राहणार नाही!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह मो. ९९२२२७८९२२







