धाराशिव : जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून, विविध ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनांत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, एक दुचाकी आणि चक्क सात म्हशी असा एकूण ५ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कळंब, तुळजापूर आणि शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंब बसस्थानकातून सोन्याचे गंठण लंपास
कळंब बसस्थानक परिसरातून एका महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे आणि २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत हातोहात लांबवले. मनीषा नवनाथ वाघमारे (वय ४३, रा. वडगाव सिद्धेश्वर, जि. धाराशिव) या दि. २७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कळंब ते सोलापूर बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. या प्रकरणी त्यांनी ३० एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तुळजापुरातून दुचाकीची चोरी
दुसऱ्या घटनेत तुळजापूर शहरातील बारलिंग मंदिराजवळून एका शेतकऱ्याची दुचाकी चोरीला गेली आहे. त्रिंबक दादाराव डोलारे (वय ३८, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) यांची ४० हजार रुपये किमतीची ‘एचएफ डिलक्स’ मोटरसायकल (क्र. एमएच २५ एक्यू ३८४८) दि. २९ एप्रिल रोजी दुपारी सव्वादोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पळवली. याप्रकरणी डोलारे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात ३० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवसाढवळ्या शेतातून तब्बल ७ म्हशींची चोरी
सर्वांत मोठी चोरीची घटना शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. करंजकल्ला (ता. कळंब) येथील शेतकरी पांडुरंग शिवलिंग कोरे (वय ५५) यांच्या शेत गट क्र. १२५ मधून त्यांच्या ६ आणि त्यांच्या पुतण्याची १ अशा एकूण ७ म्हशी चोरून नेण्यात आल्या. या म्हशींची अंदाजे किंमत ४ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी पांडुरंग कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कालिदास राजाभाऊ गाढवे, दादा उमाराव पवार (दोघे रा. भाटशिरपुरा, ता. कळंब) आणि दीपक दत्ता पवार (रा. जवळा पारधी पेढी, ता. कळंब) या तीन आरोपींविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही घटनांचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.







