उमरगा : खरीप २०२० चा प्रलंबित पीक विमा आणि ‘एक रुपयात पीक विमा’ योजना पुन्हा लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज (१४ मे) उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे संतप्त शेतकऱ्यांनी भव्य रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी नेते अनिल जगताप आणि स्थानिक लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. “येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्यास धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करण्यात येईल,” असा कडक इशारा यावेळी या नेत्यांनी प्रशासनाला दिला.
वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांचा मोठा सहभाग
खरीप २०२० मधील १३४ कोटी रुपयांच्या पीक विम्याला कोणतीही न्यायालयीन स्थगिती नसताना शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी ५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, शासनाला जाग न आल्याने आज नारंगवाडी येथे रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात आमदार प्रवीण स्वामी आणि शेतकरी नेते अनिल जगताप यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार नागणे, अमोल चव्हाण, राहुल डोणगाव, ॲड. विकास पाटील आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदारांनी स्वतः आंदोलनात सहभाग घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विमा कंपनीची मनमानी आणि वेळकाढूपणा


उच्च न्यायालयाचा निकाल लागून सहा महिने उलटले, तरीही पीक विमा कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैशांचे वाटप केले जात नाही. पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेऊन कंपनी जाणीवपूर्वक नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय तांत्रिक समितीने कंपनीचे हे आक्षेप फेटाळून लावले आहेत. तरीही कंपनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून वेळकाढूपणा करत आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झालेले असताना, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र अद्याप एक दमडीही मिळालेली नाही. तसेच, चालू वर्षीही प्रचंड अतिवृष्टी होऊन नुकसान झालेले असताना काही मंडळांना भरपाईतून वगळल्याची चर्चा रंगत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता
प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित ठेवले जात आहे. “विमा कंपनी आणि राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन पैसे वाटप न केल्यास संपूर्ण जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडेल,” अशी चर्चा आता शेतकरी वर्गात सुरू आहे.
दरम्यान, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आमदार प्रवीण स्वामी आणि शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.






