धाराशिव : कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गोवंशीय जनावरे घेऊन जाणाऱ्या एकाला धाराशिव शहर पोलिसांनी रविवारी (ता. १७) सकाळी पकडले. या कारवाईत पोलिसांनी ७० हजार रुपये किमतीची तीन जनावरे जप्त केली असून, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र मच्छिंद्र मगर (वय ३६, रा. पापनास नगर, तुळजापूर नाका, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १७) सकाळी सात वाजेच्या सुमारास खिरणी मळा परिसरातील गुलशन अल्फाज शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून आरोपी राजेंद्र मगर हा गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या घेऊन जात होता. दरम्यान, याची माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन जर्सी व गावरान गायी आणि एक खोंड अशी एकूण ७० हजार रुपये किमतीची गोवंशीय जनावरे मिळून आली. पोलिसांनी ही सर्व जनावरे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांच्या वतीने सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात आरोपी राजेंद्र मगर याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ)(१) आणि ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.





