आंबी : परंडा तालुक्यातील कंडारी शिवारात सामाईक बांधावरील वाळलेले गवत जाळत असताना आगीचा भडका उडून शेजारील उभी केळीची बाग आणि ठिबक सिंचन जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या भीषण आगीत शेतकऱ्याचे तब्बल ११ लाख २६ हजार रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र रामहारी मोरे (वय ५७, रा. कंडारी, ता. परंडा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महारुद्र रामहरी मोरे (वय ६१, रा. कंडारी) यांनी आंबी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. १९) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंडारी शिवारातील शेत गट क्रमांक २९५ मध्ये सोमवारी (ता. १८) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी राजेंद्र मोरे हे दोन शेतांच्या सामाईक बांधावरील वाळलेले गवत जाळत होते. मात्र, वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले व ही आग वेगाने महारुद्र मोरे यांच्या शेतात पसरली. यात त्यांच्या शेतातील उभे असलेले केळीचे पीक आणि संपूर्ण ठिबक सिंचन आगीच्या भक्षस्थानी पडले.
या आगीत केळीच्या पिकाचे अंदाजे ९ लाख २५ हजार रुपये तर ठिबक सिंचनाचे असे मिळून एकूण ११ लाख २६ हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. महारुद्र मोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून आंबी पोलिसांनी राजेंद्र मोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६ (एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.



