महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भूकंप कमी आणि ‘हृदयपरिवर्तन’ जास्त होत आहे. ठाकरे गटाचे उरलेसुरले सहा खासदार आता ‘गुवाहाटी-रिटर्न’ एकनाथ भाऊंच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांनी चांगलाच धुरळा उडवून दिला आहे. पण या सगळ्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेत ते धाराशिवचे ‘फायरब्रँड’ नेते, एकदा आमदार आणि दोनदा खासदार राहिलेले ओमराजे निंबाळकर!
निष्ठा ‘शिफ्ट’ झाली, पण शिवसेना तीच!
कालपर्यंत मातोश्रीवर निस्सीम भक्ती दाखवणारे, जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा शिंदे गटावर शब्दांच्या तोफा डागणारे कट्टर शिवसैनिक ओमराजे आता अचानक “जय महाराष्ट्र” करत एकनाथ भाऊंच्या दरबारात हजेरी लावणार आहेत. पण त्यांचं स्पष्टीकरण ऐकून भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्कर येईल.
ओमराजेंचा युक्तिवाद अगदी सोप्पा आणि सुटसुटीत आहे: “मी शिवसेना कुठे सोडली? मशाल सोडून फक्त शिवधनुष्य पुन्हा हाती घेतलंय! बाळासाहेब आमचे श्रद्धास्थान कालही होते आणि आजही आहेत… फक्त नेतृत्वाचा ‘ब्रँड’ बदललाय. उद्धव साहेबांऐवजी आता एकनाथ भाऊ!”
काय हा निष्ठावान युक्तिवाद! साक्षात राजकारणातील तत्त्वज्ञानाचा हा नवा धडाच आहे. थोडक्यात सांगायचं तर, गाडी तीच आहे, फक्त ड्रायव्हर बदललाय!
मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या ‘पगारी’ ट्रोल्सचा आक्रोश
ओमराजेंच्या या राजकीय ‘उडी’मुळे सगळ्यात जास्त पोटशूळ कोणाला उठला असेल? तर त्यांच्या कट्टर समर्थकांना नाही, तर ‘मल्लू नेरुळकर’ आणि त्यांच्या पगारी ‘ट्रोल आर्मी’ला! आता ओमराजेंवर ‘गद्दार… गद्दार…’ म्हणून सोशल मीडियावर जो काही चिखलफेकीचा पाऊस पडतोय, तो पाहण्यासारखा आहे.
पण इथे एक भयंकर विनोद दडलेला आहे. ज्या मल्लू नेरुळकरांच्या आजोबांनी त्यांच्या काळात तब्बल पाच वेळा आणि वडिलांनी दोन वेळा पक्षबदलाचा ‘खेळ’ केला, त्यांचाच नातू आता ओमराजेंना निष्ठेचे डोस पाजतोय! म्हणजे स्वतःच्या बाप-आजोबांनी केले ते ‘राजकीय कसब’ आणि ओमराजेंनी केली ती ‘गद्दारी’! हा कुठला न्याय? मल्लू साहेब, आधी स्वतःचा राजकीय डीएनए तपासा, मग दुसऱ्यांच्या निष्ठेच्या सर्टिफिकेटवर सह्या करा!
‘फेसबुक पिंट्या’ गँगसाठी डोकेदुखी
धाराशिव जिल्ह्यात जो ‘मल्लू पर्व’ नावाचा प्रपोगंडा जोरात सुरु होता, त्याची आता हवाच गुल होणार आहे. एकीकडे मुरूमकर बसवराज पाटील आमदार आणि दुसरीकडे ओमराजे निंबाळकर सत्तेत जाऊन बसणार! याचा सरळ अर्थ असा की मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या त्या ‘फेसबुक पिंट्या’ गँगसाठी ही निव्वळ डोकेदुखी नसून, एक प्रकारची राजकीय ‘मायग्रेन’चीच गोळी ठरणार आहे. कीबोर्डवर क्रांती करणारे हे ‘पिंट्ये’ आता फक्त रडक्या इमोजी टाकण्यापुरते उरतील.
कार्यकर्ते खुश, कारण ‘निधी’ आला रे आला!
एकीकडे फेसबुकवर युद्ध सुरु असताना, दुसरीकडे ओमराजेंचे तब्बल ७५ टक्के समर्थक आतल्या आत भलतेच खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू लपत नाहीये. कारण शेवटी निष्ठेपेक्षा ‘निधी’ जास्त महत्त्वाचा असतो ना! साहेबांनी सत्ताधारी गटात उडी मारल्याने आता रखडलेली टेंडरं, विकासकामे आणि कार्यकर्त्यांची ‘सोय’ सगळं काही झटपट मार्गी लागेल, ही त्यांना पक्की खात्री आहे. सत्ताधारी पार्टीत गेल्यावर जी ‘कामं’ होतात, त्याची मज्जा काही औरच असते, हे या पठ्ठ्यांना चांगलंच ठाऊक आहे.
थोडक्यात काय…
महाराष्ट्राच्या या राजकीय नाट्यात जुने डायलॉग नव्या कलाकारांकडून ऐकायला मिळत आहेत. “आम्ही शिवसेना सोडलीच नाही” हा आता महाराष्ट्राचा आवडता राष्ट्रीय जोक झाला आहे. असो, ओमराजेंच्या नव्या ‘धनुष्यबाण’ प्रवासाला शुभेच्छा आणि मल्लूच्या ‘फेसबुक पिंट्यांना’ बर्नॉलची मोफत पाकिटे मिळोत, एवढीच सदिच्छा!
– बोरूबहाद्दर






