नवी दिल्ली | धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी धाराशिवच्या विकासाला गती देण्यासाठी रेल्वे, शिक्षण, सिंचन, वीज, उद्योग आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या त्यांनी गृहमंत्र्यांसमोर मांडल्या.
खासदार निंबाळकर यांनी धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वे प्रकल्पातील तुळजापूर–सोलापूर या उर्वरित मार्गाचे तातडीने टेंडर काढून काम सुरू करावे, अशी प्रमुख मागणी केली. तसेच धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाची स्थापना, कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा, नांदेड–पनवेल एक्सप्रेसला ढोकी येथे थांबा, लातूर–मुंबई रेल्वेला कळंब रोड स्थानकावर थांबा आणि हरंगुळ–हडपसर रेल्वे सेवा पुणे स्थानकापर्यंत विस्तारण्याची मागणीही त्यांनी केली.
याशिवाय, जिल्ह्याच्या वाढत्या औद्योगिक, कृषी व नागरी वीज गरजा लक्षात घेऊन नवीन २०० केव्ही ईएचव्ही (EHV) उपकेंद्रांची उभारणी करण्यात यावी, तसेच बार्शी टेक्स्टाईल मिलचे आधुनिकीकरण करून ती तातडीने सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या उद्योगाच्या पुनरुज्जीवनामुळे परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही त्यांनी प्राधान्य देत प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील ट्रिगर निकषांमध्ये सुधारणा करून प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या आधारे भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. विद्यमान निकषांमुळे अनेक पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहत असल्याचे त्यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी या मागण्या अत्यंत आवश्यक असल्याचे सांगताना खासदार निंबाळकर यांनी, गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व विषय सकारात्मकपणे ऐकून संबंधित मंत्रालयांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती दिली.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग आप्पा बारणे, नरेश म्हस्के, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते.






