धाराशिव: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत आहेत, तर दुसरीकडे शाळेत शिक्षक नसल्याने चीड आलेले चिमुकले विद्यार्थी चक्क जिल्हा परिषदेत घुसून आंदोलन करत आहेत. नुकताच सोनारी येथे विद्यार्थ्यांनी थेट सीईओं समोर वर्ग भरवून “शिक्षक द्या, तेव्हाच माघार” असा दणका दिला. पण प्रशासनाचे डोळे उघडलेत का? मुळीच नाही! कारण जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तब्बल ९०९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची धक्कादायक आकडेवारी नव्या संचमान्यतेतून समोर आली आहे.
विशेष म्हणजे, या सगळ्या प्रशासकीय गोंधळात जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील ‘धाराशिव व्हिजन २०३०’ची रंगीत स्वप्ने विकण्यात मग्न आहेत, तर त्यांचे पती राणा पाटील फेसबुक लाईव्हच्या व्हर्च्युअल जगात व्यस्त आहेत.
संचमान्यतेचा ‘अजब-गजब’ कारभार
२०२५-२६ च्या नव्या संचमान्यतेने शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणला आहे. जिल्ह्यात एका बाजूला ९०९ पदे रिक्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला २९१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. म्हणजे जिथे खरोखर गरज आहे तिथे शिक्षक नाहीत, आणि जिथे गरज नाही तिथे गर्दी!
तालुकानिहाय ‘शिक्षकांची वाणवा’:
-
उमरगा: जिल्ह्यात सर्वाधिक २५१ पदे रिक्त. (मंजूर १,२२१ पैकी १,१९६ कार्यरत).
-
तुळजापूर: २०५ पदे रिक्त, तर तब्बल ९५ शिक्षक अतिरिक्त. (मंजूर १,८१७ पैकी १,७०८ कार्यरत).
-
कळंब: ८५ पदे रिक्त. (मंजूर १,२५५ पैकी १,२०४ कार्यरत).
-
धाराशिव: ५१ पदे रिक्त, तर ४५ अतिरिक्त.
-
इतर तालुके: भूम (९१), वाशी (७७), परंडा (६९) आणि लोहारा (५३) येथेही शेकडो पदे रिक्त आहेत.
माध्यमिकची स्थिती त्याहून भयानक, अधिकारी ‘नॉट रिचेबल’!
प्राथमिकची अवस्था पाहिली, आता माध्यमिकची ऐका. जिल्ह्यातील ३१४ माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ३०१ पदे रिक्त आहेत! जवळपास प्रत्येक शाळेत सरासरी एक पद रिकामे, असा याचा अर्थ होतो. या गंभीर परिस्थितीबाबत जेव्हा शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांना सविस्तर माहिती विचारण्यात आली, तेव्हा त्यांनी चक्क माहिती देण्यासच नकार दिला. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असाच काहीसा हा प्रकार सुरू आहे.
सोनारीचा धडा प्रशासन कधी गिरवणार?
सोनारी येथील शाळेत गणित व विज्ञानाचे शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी संतापून शाळेला कुलूप ठोकले होते. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच शाळा भरवली. विद्यार्थ्यांच्या या ‘हटके’ आंदोलनानंतर आणि घोषणाबाजीनंतर प्रशासनाला घाम फुटला आणि तातडीने शिक्षक नियुक्तीचा आदेश काढावा लागला.
खरे प्रश्न हे आहेत की:
-
प्रत्येक शाळेला हक्काचा शिक्षक मिळवण्यासाठी आता विद्यार्थ्यांनी रोज सीईओंच्याच दालनात जाऊन वर्ग भरवायचे का?
-
‘व्हिजन २०३०’ ची स्वप्ने दाखवणाऱ्या नेत्यांना २०२६ मधले हे रिकामे वर्ग का दिसत नाहीत?
-
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम आणि रिकाम्या वर्गांना शिक्षक देण्याऐवजी, नेतेमंडळी फक्त ‘फेसबुक लाईव्ह’च्या लाईक्स मोजण्यातच धन्यता मानणार का?
शिक्षण विभागाचा हा गोंधळ आणि नेत्यांची कमालीची उदासीनता पाहता, धाराशिवच्या विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या तरी ‘वाऱ्यावर’ आणि नेत्यांचे राजकारण ‘वायरल’वर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष न दिल्यास, सोनारीसारखी आंदोलने जिल्हाभर भडकण्यास वेळ लागणार नाही!






