धाराशिव: जनतेच्या सोयी-सुविधांची चाड नसलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चना पाटील यांच्या मनमानी कारभाराचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मागील ४० वर्षांपासून सुरू असलेला पंचायत समिती ते समतानगर जाणारा वर्दळीचा रस्ता बंद करण्यासाठी ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री चक्क विटांची भिंत बांधण्याचे कारस्थान रचण्यात आले. कोणतीही प्रशासकीय मान्यता नसताना, कसलीही अधिकृत वर्क ऑर्डर नसताना ‘तेर’च्या एका लाडक्या कंत्राटदाराला पुढे करून मध्यरात्रीच्या अंधारात सुरू असलेला हा मनमानी डाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत उधळून लावला.
प्रशासकीय मान्यता नसताना मध्यरात्री दरोडासदृश कारभार
पंचायत समिती समोरून जाणारा हा रस्ता थेट जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, नगरपालिका, पोलीस मुख्यालय आणि बस स्थानक या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. दररोज हजारो नागरिकांची येथून ये-जा असते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हट्टापायी हा रस्ता बंद करण्याचे पद्धतशीर षडयंत्र सुरू आहे. यापूर्वीही तीन वेळा रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु जनतेच्या रोषामुळे आणि विरोधकांमुळे तो फसला होता.

शुक्रवारी संपूर्ण शहर महालक्ष्मी सणात मग्न असताना, या सणाचा गैरफायदा घेत बोगस कागदपत्रांच्या आधारे एका कंत्राटदाराने विटांची भिंत उभारण्याचे काम हाती घेतले. पंचायत समितीसमोरील दोन गेटपैकी जिल्हा परिषदेच्या बाजूकडील गेटवर भिंत बांधून रस्ता रोखण्यात आला.
युवासेनेचा मध्यरात्री राडा, दुसरे गेट बंद करण्याचा डाव उधळला
रात्रीच्या अंधारात रस्ता बंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच शिवसेना (ठाकरे गट) आणि युवासेनेचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत काम तातडीने बंद पाडले आणि जोरदार घोषणाबाजी करत मध्यरात्री मोठा राडा झाला. कंत्राटदार आणि पाठीराख्यांना पळता भुई थोडी झाली. युवासेनेच्या सतर्कतेमुळे दुसरे गेट बंद करण्याचा प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यात यश आले.
‘मी म्हणेन तीच पूर्व दिशा’; जनतेत तीव्र संताप
“मी म्हणेन तेच होणार” या हुकूमशाही वृत्तीने कारभार हाकणाऱ्या अर्चना पाटील यांच्या या कृतीमुळे धाराशिवकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या सोयीसाठी काम करायचे असते की स्वतःचा राजकीय हट्ट पुरवण्यासाठी नागरिकांना वेठीस धरायचे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. नियम आणि कायद्याला पायदळी तुडवून मध्यरात्री भिंत बांधणाऱ्या या लाडक्या कंत्राटदारावर आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




