धाराशिव | धाराशिव जिल्हा भाजपमध्ये वाढत्या अंतर्गत गटबाजीची राज्य नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना मुंबईत बोलावून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला.
धाराशिव जिल्ह्यात भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या विरोधात पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे बंड पुकारल्यानंतर जिल्हा भाजपमध्ये दोन गट स्पष्टपणे समोर आल्याचे चित्र आहे. एकीकडे जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा गट, तर दुसरीकडे आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखालील गट अशी विभागणी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रविवारी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार राणा पाटील यांच्या कथित एकाधिकारशाहीवर जोरदार टीका करण्यात आली. पक्ष संघटनेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दत्ताभाऊ कुलकर्णी यांना मुंबईत बोलावून जिल्ह्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतल्याचे समजते.
याबाबत दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “संघटनात्मक बांधणी आणि जिल्ह्यातील सुरू असलेल्या घडामोडींवर प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा झाली,” एवढीच प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, धाराशिव भाजपमधील वाढत्या गटबाजीवर प्रदेश नेतृत्व कोणती भूमिका घेते आणि पुढील काळात पक्ष संघटनेत कोणते बदल होतात, याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






