रविवारी धाराशिवमध्ये निष्ठावंतांनी फोडलेला बंडाचा ‘बॉम्ब’ अजून शांतही झाला नव्हता, तोच तुळजापूरचे आमदार राणा पाटील आणि त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या ‘बगलबच्चांच्या’ छातीत धडकी भरवणाऱ्या दोन मोठ्या घडामोडी एकाच दिवशी घडल्या आहेत. एक बातमी आलीये थेट मुंबईतून, तर दुसरी आलीये देशाची राजधानी दिल्लीतून! या दोन्ही बातम्यांनी राणा पाटील गटाची झोप उडवली नसती तरच नवल.
१. मुंबईचा झटका: हायकमांडचा ‘क्लास’ आणि दत्ताभाऊंची ‘गुळमुळीत’ सारवासारव!

धाराशिवमध्ये निष्ठावंत विरुद्ध नवा गट असा जो उघडा-नागडा राडा रविवारी झाला, त्याची थेट ‘वरून’ म्हणजे राज्य नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना थेट मुंबईत बोलावून घेतले आणि जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींचा ‘सविस्तर’ आढावा (वाचा: कानउघाडणी) घेतला.
रविवारी निष्ठावंतांच्या मेळाव्यात राणा पाटलांच्या ‘एकाधिकारशाही’वर जो काही हल्लाबोल झाला, त्याचा सगळा रिपोर्ट आता प्रदेशाध्यक्षांच्या टेबलावर पोहोचला आहे. मुंबईत नक्की काय ‘धुलाई’ झाली, हे बाहेर सांगायला कुणी तयार नाही. जेव्हा दत्ताभाऊंना याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी अगदी ठरल्याप्रमाणे, “संघटनात्मक बांधणी आणि घडामोडींवर चर्चा झाली,” अशी अत्यंत सेफ आणि गुळमुळीत प्रतिक्रिया दिली. पण आतमध्ये ‘काय काय घडलंय आणि कुणा-कुणाची विकेट जाणार आहे,’ याची चर्चा आता धाराशिवच्या चहाच्या टपऱ्यांवर रंगू लागली आहे.
२. दिल्लीचा हादरा: कट्टर वैरी थेट अमित शहांच्या दरबारात!

दुसरी आणि राणा पाटलांसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरणारी बातमी म्हणजे, त्यांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली भेट!
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करून शिंदे गटात (म्हणजेच थेट सत्तेत आणि भाजपच्या मांडीला मांडी लावून) बसलेले ओमराजे आता जबरदस्त फॉर्मात आले आहेत. त्यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा यांच्यासमोर धाराशिवच्या विकासाचे भंबलठ्ठ निवेदन ठेवले.
काय होत्या ओमराजेंच्या मागण्या?
-
तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाचे तातडीने टेंडर काढणे.
-
जिल्ह्यात ‘केंद्रीय विद्यालय’ स्थापन करणे.
-
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देणे.
-
बार्शी टेक्स्टाईल मिलचे आधुनिकीकरण करून ती पुन्हा सुरू करणे.
-
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे: पीक विमा योजनेतील ‘ट्रिगर निकष’ बदलून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे शेतकऱ्यांना भरपाई देणे.
शहांनीही सर्व विषय सकारात्मकपणे ऐकून घेत कार्यवाहीचे आश्वासन दिले. यावेळी ओमराजेंच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह दिग्गज नेते हजर होते.
कोंडीत सापडलेले राणा: इकडे आड, तिकडे विहीर!
आता या सगळ्या राजकारणाचा ‘डिकोड’ केला, तर राणा पाटील यांची चहुबाजूंनी कशी कोंडी झालीये हे स्पष्ट दिसते.
एकीकडे ओमराजे निंबाळकर सत्तेत आल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या (आणि पर्यायाने अमित शहांच्या) थेट संपर्कात आले आहेत. तर दुसरीकडे, याच ओमराजेंची धाराशिवमधील भाजपच्या निष्ठावंत (आणि राणा पाटील विरोधी) नेत्यांसोबतची ‘सलगी’ लक्षणीयरीत्या वाढली आहे!
म्हणजेच, “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र” या न्यायाने ओमराजे आणि भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आतून एकवटत असल्याचे चित्र आहे. एकीकडे स्वतःच्याच पक्षातील जुने कार्यकर्ते ‘आमदारकीच्या सातबाऱ्यावर’ हक्क सांगून बंड करत आहेत आणि हायकमांड मुंबईत जाब विचारत आहे, तर दुसरीकडे कट्टर शत्रू दिल्लीत जाऊन पक्षाच्या ‘बॉस’ला भेटून फोटो काढत आहे.
सध्याच्या या राजकीय चक्रव्यूहात राणा पाटील आणि त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ आता कोणा-कोणाला ट्रोल करणार? धाराशिवच्या या राजकीय ‘महाभारतात’ आता पुढचा अंक आणखी रंजक होणार, हे मात्र नक्की!
‘पेड’ ट्रोलिंगची फौज आणि दुसऱ्याच्या ‘सातबाऱ्यावर’ मालकीचा डाव!
धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!





