धाराशिव: ‘आपला जीव धाराशिव’ ही भावनिक टॅगलाईन मुळात दुसऱ्याचीच चोरलेली आणि गाजावाजा करून आणलेला ‘व्हिजन २०३०’चा कार्यक्रम म्हणजे निव्वळ दिवाळीतला फुसका बार! या ‘व्हिजन’च्या रंगारंग कार्यक्रमानंतर राणा पाटील यांच्या मागे जी काही साडेसाती आणि भुंगे लागले आहेत, ते पाहता या ‘व्हिजन’चा खरा अर्थ ‘कन्फ्युजन’ असाच निघतोय.
भाजप निष्ठावंतांचा एल्गार आणि दादांची ‘रावणी’ गुर्मी!
सध्या जिल्ह्यात भाजपची अवस्था ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी झाली आहे. भाजपचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे धाराशिवला ‘आले काय आणि गेले काय’, ! ॲड. अनिल काळे यांच्या अपमानाचे प्रकरण इतके तापले आहे की, रविवारी भाजपच्या निष्ठावंत नेत्यांनी खास मेळावा घेऊन राणा पाटील यांच्यावर अक्षरशः आगपाखड केली.
पण दादांचे काय? दादा आपल्याच गुर्मीत! जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांची समजूत काढणे तर दूरच, पण साहेबांचा इगो थेट रावणालाही लाजवेल असा फुगला आहे. पैसा, सत्ता आणि इस्टेट यांच्या जिवावर आपण कुणालाही विकत घेऊ शकतो आणि कुणालाही खिशात घालू शकतो, हा त्यांचा अहंकार गगनाला भिडला आहे. याच गुर्मीतून खोट्या केसेस टाकणे, ‘ट्रोल आर्मी’ पोसून विरोधकांची बदनामी करणे, असे उद्योग सध्या जोरात सुरू आहेत. पण लक्षात कोण घेतोय, रावणाची लंकाही सोन्याचीच होती, पण ती टिकली नाही!
इकडे ओमराजे अमित शहांच्या दरबारात, तिकडे दादा ‘फेसबुक’वर!
राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असते. एकीकडे राणा पाटील यांचे कट्टर राजकीय वैरी, खासदार ओमराजे निंबाळकर थेट दिल्लीत जाऊन भाजपचे ‘किंग’ अमित शाह यांच्या भेटीगाठी घेत होते, तर दुसरीकडे आपले राणा दादा काय करत होते? तर ते ‘फेसबुक लाईव्ह’वर ज्ञान पाजळत बसले होते!
सर्वांत मोठा विनोद तर पुढेच आहे…
दादा फेसबुक लाईव्हवर येऊन जनतेला काय सांगत होते? तर म्हणे, “‘व्हिजन २०३०’ नुसार संध्याकाळी ७ वाजले की घरातील टीव्ही बंद ठेवायचा, मोबाईल बंद ठेवायचा… फक्त अभ्यास करायचा!”
अहो दादा, लोकांना मोबाईल बंद ठेवायला सांगताना तुम्ही स्वतः मोबाईलवरच ‘फेसबुक लाईव्ह’ करत होतात, याचं काय? म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः… फेसबुक लाईव्हमध्ये मग्न!’ हा सगळा प्रकार म्हणजे ‘कॉमेडी नाइट्स विथ राणा दादा’ असाच झाला आहे.
ताईंचा ‘शोध’: पोरं अभ्यासाला लागली!
या सगळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा आणि दादांच्या अर्धांगिनी सौ. अर्चना पाटील यांचा तोरा तर वेगळाच आहे. “बघा, आमचं व्हिजन कसं सक्सेस झालंय, पोरं कशी अभ्यास करत आहेत,” असा दावा त्या करत आहेत.
हे ऐकून धाराशिवच्या जनतेला आता असा भास होऊ लागलाय की, ताई अध्यक्षा होण्यापूर्वी जिल्ह्यातील पोरं फक्त मोबाईलवर पब्जी (PUBG) खेळत होती, टीव्हीवर ‘छोटा भीम’ बघत होती आणि ताईंनी ‘व्हिजन’ आणलं तेव्हा कुठे या पोरांना ‘अभ्यास’ नावाचा प्रकार पहिल्यांदाच समजला!
थोडक्यात सांगायचे तर, जिल्ह्यात शिक्षकांची ९०९ पदे रिक्त आहेत, तिकडे कोणाचेही लक्ष नाही. पण ‘व्हिजन २०३०’ च्या नावाखाली जो काही ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा खेळ सुरू आहे, तो पाहून धाराशिवची जनता मात्र आता मनोमन म्हणू लागली आहे— “देवा, वाचव एकदाचा हा आमचा जीव, धाराशिव!”





