धाराशिव : पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, सरकारकडून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा दावा केला.
तुळजाभवानी मातेच्या दरबारात साकडे घालताना, ‘मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारला सद्बुद्धी दे’, अशी प्रार्थना केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाशी संबंधित काही कागदपत्रे माध्यमांसमोर दाखवली. खरी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे असतानाही ती रद्द केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जातपडताळणी समितीतील काही अधिकारी पैशांची मागणी कागदावरच लिहून करत असल्याचा आरोप करत, त्यासंदर्भातील कागदपत्रे असल्याचा दावा त्यांनी केला.
बावनकुळे यांच्या पत्राचा दाखला
मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचाही यावेळी दाखला दिला. मराठा आरक्षणाशी संबंधित नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘सरकार ५८ लाख नोंदी रद्द करण्यासाठी समाजाला भ्रमित करत आहे,’ असा आरोप जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी हा प्रकार थांबवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘सरकार षड्यंत्र रचत आहे’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आरोप करताना जरांगे पाटील यांनी, सरकारकडून षड्यंत्र सुरू असल्याचा दावा केला. आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचे तसेच लाठीहल्ला करण्याचे आदेश देण्यासाठी पत्रव्यवहार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘दम असेल तर समोर या,’ असे आव्हानही जरांगे पाटील यांनी सरकारला दिले.
दरम्यान, तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




