धाराशिव : जिल्ह्यात युरिया, डीएपीसह विविध खतांच्या वितरणात होत असलेली असमानता आणि खत कंपन्यांकडून कथितपणे केली जाणारी लिंकिंगची सक्ती याबाबत जिल्हा कृषी विभागाच्या वतीने खत विक्रेते व कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत खत वितरणातील अडचणी, उपलब्धता, विक्रेत्यांना होणारा पुरवठा तसेच शेतकऱ्यांना खत विक्री करताना येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साळवे, कृषी विकास अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील ५० हून अधिक किरकोळ व घाऊक खत विक्रेते तसेच विविध खत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत काही निवडक विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात खतसाठा उपलब्ध होत असताना लहान किरकोळ विक्रेत्यांना आवश्यक प्रमाणात खत मिळत नसल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. विशेषतः युरियाचा पुरवठा सर्व परवानाधारक विक्रेत्यांना समान आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे राज्य युवक अध्यक्ष नवनाथ जाधवर यांनी खत कंपन्यांकडून कथितपणे केली जाणारी लिंकिंगची सक्तीचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. खतासोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती होत असल्यास त्याचा आर्थिक भार लहान विक्रेत्यांवर पडतो आणि त्याचा परिणाम शेवटी शेतकऱ्यांवर होतो, असा मुद्दा त्यांनी मांडला.
मोठ्या घाऊक विक्रेत्यांपुरता खतपुरवठा मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील छोट्या कृषी सेवा केंद्रांनाही त्यांच्या पात्रतेनुसार युरिया व इतर खतांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
POS मशीनवरील व्यवहाराबाबत सूचना
बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खत विक्री व वितरणाबाबत विक्रेते आणि कंपनी प्रतिनिधींना विविध सूचना दिल्या. शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार खत उपलब्ध करून देणे, विक्री प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे आणि उपलब्ध साठ्याची योग्य नोंद ठेवण्यावर भर देण्यात आला.
POS मशीनद्वारेच खत विक्री करणे, POS मशीनवरील साठा आणि प्रत्यक्ष दुकानातील खतसाठा यामध्ये ताळमेळ ठेवणे तसेच शेतकऱ्यांना व्यवहार आणि उपलब्धतेबाबत आवश्यक माहिती देणे, अशा सूचना देण्यात आल्या.
खताची रॅक आल्यानंतर त्याची माहिती संबंधित विक्रेत्यांपर्यंत पोहोचविणे आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
‘शेतकरी केंद्रस्थानी ठेवून वितरण व्यवस्था हवी’
खत वितरणाची संपूर्ण व्यवस्था शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात यावी, अशी भूमिका शेतकरी संघटनेने मांडली. ग्रामीण भागातील छोट्या कृषी सेवा केंद्रांवर खत उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांना खतासाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे मोठ्या विक्रेत्यांसोबतच छोट्या विक्रेत्यांनाही योग्य प्रमाणात खत उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
दरम्यान, खत वितरणातील भेदभाव, लिंकिंगची कथित सक्ती किंवा छोट्या विक्रेत्यांना खतपुरवठ्यात दुजाभाव कायम राहिल्यास शेतकरी संघटना हा मुद्दा पुन्हा आक्रमकपणे मांडणार असून, आवश्यकतेनुसार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नवनाथ जाधवर यांनी दिला.
शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात खत उपलब्ध होणे आवश्यक असून खत वितरणात कृत्रिम अडचणी किंवा असमानता निर्माण होऊ नये, अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, याकडे आता शेतकरी आणि खत विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.





