धाराशिव: ‘माऊलीं’नी (अध्यक्षा अर्चना पाटील) पिंपळा (खुर्द) च्या महादेवाच्या साक्षीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जो ‘मुख्यमंत्रीपदाचा’ राजकीय बाउन्सर टाकला होता, त्यावर सरनाईक क्लीन बोल्ड होणार असेच वाटत होते. पण, ठाण्याचे मुरब्बी राजकारणी असलेल्या सरनाईकांनी माऊलींचा हा बाउन्सर अचूक ओळखला आणि अत्यंत शिताफीने ‘कव्हर ड्राईव्ह’ मारत स्वतःची विकेट (आणि मंत्रीपद) वाचवली!
सरनाईकांना आतून फुटला घाम: ‘शिंदे साहेबांना काय उत्तर देऊ?’
जेव्हा माऊली भर कार्यक्रमात म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीसांना राग येईल, पण तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे,” तेव्हा वरवर हसणाऱ्या प्रताप सरनाईक यांना आतून मात्र चांगलाच घाम फुटला असणार!
सरनाईकांच्या मनात नक्कीच विचार आला असेल की, “अहो माऊली, आधीच ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ राहण्यासाठी आमची किती स्पर्धा सुरू असते, त्यात तुम्ही इथे येऊन मला थेट मुख्यमंत्रीच करून टाकलंत! जर ही बातमी एकनाथ शिंदेंकडे पोहोचली, तर उद्या सकाळी माझे पालकमंत्रीपदही काढून घेतले जाईल!”
म्हणूनच, कोणताही धोका न पत्करता सरनाईकांनी तत्काळ डॅमेज कंट्रोल केले आणि अत्यंत सावध शब्दांत पलटवार केला— “मी एकनाथ शिंदे यांचा सैनिक आहे. पालकमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री, हेच माझं भाग्य!” थोडक्यात काय, तर माऊलींच्या ‘नवसातून’ सुटण्यासाठी सरनाईकांना चक्क एकनाथ शिंदेंच्या ‘सैनिक’ असल्याचा ढाल म्हणून वापर करावा लागला!
माऊलींचे ‘आशीर्वाद’ की राजकीय ‘ट्रॅप’?
धाराशिवच्या राजकीय वर्तुळात आता अशी मिश्किल चर्चा रंगली आहे की, माऊली ज्याला ‘आशीर्वाद’ देतात, त्याचा राजकीय ‘करेक्ट कार्यक्रम’ ठरलेलाच असतो!
-
२०२४ च्या लोकसभेत स्वतः राष्ट्रवादीला (अजित पवार) ‘आशीर्वाद’ दिला आणि सव्वा तीन लाख मतांनी घरी बसल्या.
-
आता सरनाईकांना ‘मुख्यमंत्रीपदाचा आशीर्वाद’ देऊन त्यांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या नात्यात ठिणगी टाकण्याचा तर हा माऊलींचा ‘मास्टरस्ट्रोक’ नव्हता ना?
सरनाईक हुशार निघाले, त्यांनी माऊलींचा हा ट्रॅप वेळीच ओळखला आणि मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेपासून स्वतःला चार हात लांब ठेवले.
राणा दादांची रोजची ‘डॅमेज कंट्रोल’ ड्युटी!
या सगळ्यात सर्वाधिक वाईट अवस्था कोणाची असेल, तर ती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची! तिकडे राणा दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी निष्ठेने उभे राहून धाराशिवमध्ये भाजपची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इकडे त्यांच्याच पत्नी (माऊली) थेट फडणवीसांच्या नावाने ‘राग येईल’ अशी मुक्ताफळे उधळत, मित्रपक्षाच्या पालकमंत्र्याला मुख्यमंत्रीपदाच्या ऑफर वाटत सुटल्या आहेत!
नेत्यांना रोज सकाळी उठून मतदारसंघाची कामे करावी लागतात, पण राणा दादांना बहुधा रोज सकाळी उठून “आज माझ्या पत्नीने कोणाला काय नवीन विधान करून दुखावले आहे?” याचा शोध घ्यावा लागतो आणि मग संबंधितांना फोन करून सारवासारव करावी लागते, अशीच गमतीशीर चर्चा सध्या धाराशिवच्या कट्ट्यांवर ऐकायला मिळत आहे.
‘व्हिजन २०३०’ नव्हे, हे तर ‘कन्फ्युजन २०२४’!
एकूणच, धाराशिव जिल्हा परिषदेचा कारभार पाहता हे ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ नसून निव्वळ ‘कन्फ्युजन २०२४’ आहे, हे स्पष्ट झाले आहे.
-
मोडक्या शाळा दुरुस्त करायला, गुरुजींचा सव्वा कोटींचा कोरोना निधी वाटायला आणि १४ कोटींचे थकीत भाडे वसूल करायला प्रशासनाकडे ‘व्हिजन’ नाही.
-
पण, कुणाच्या गाड्या भाड्याने घ्यायच्या, कुणाला बीओटीवर (BOT) टेंडर द्यायचे आणि कुणाला कोणत्या मंदिरासमोर ‘मुख्यमंत्री’ करायचे, यात मात्र माऊली आणि प्रशासनाचा जीव चांगलाच रमला आहे!
आता सरनाईक तर ‘सैनिक’ बनून सुटले, पण माऊलींचा पुढचा राजकीय बाउन्सर कोणावर पडणार, याची धाकधूक आता धाराशिवमधील सर्वच नेत्यांना लागून राहिली आहे!





