धाराशिव: धाराशिव नगर परिषदेची अत्यंत महत्त्वाची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या मुद्द्यावर अत्यंत गंभीर चर्चा करण्यात आली आणि नगरपरिषदेने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सभेपुढील सर्वात गंभीर विषय पाणीपुरवठा विभागाशी संबंधित होता. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी टेंभुर्णी – कुर्डूवाडी -बार्शी – येडशी यादरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. या रुंदीकरणाच्या कामामध्ये उजनी धरणावरून धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन आडवी येत आहे. त्यामुळे ही पाइपलाइन स्थलांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला होता.
पाइपलाइन स्थलांतराचा खर्च नगर परिषद देणार नाही
प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) पाइपलाइन स्थलांतरित करण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र, या कामासाठी लागणाऱ्या प्रचंड खर्चाची कोणतीही तरतूद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आलेली नाही.
यावर नगर परिषदेने अत्यंत ठोस भूमिका घेतली आहे. सदर पाइपलाइन ही धाराशिव शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी अत्यावश्यक सार्वजनिक मालमत्ता आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पाइपलाइन स्थलांतरित करावी लागत आहे. यामध्ये पाइपलाइनची तांत्रिक कामे, नवीन पाइपलाइन खरेदी, आवश्यक साहित्य, खोदकाम, आणि पुन्हा रस्ता दुरुस्ती यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे.
धाराशिव नगर परिषदेची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित आहे. पाइपलाइन स्थलांतराचा प्रचंड आर्थिक भार उचलणे नगर परिषदेला सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. नगर परिषदेकडे उपलब्ध असलेला निधी हा पाणीपुरवठा योजनेची दैनंदिन देखभाल-दुरूस्ती आणि इतर अत्यावश्यक नागरी सेवांसाठी वापरणे अत्यंत आवश्यक आहे. या पाइपलाइन स्थलांतरासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद किंवा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
नगरपरिषदेचा ठाम निर्णय
त्यामुळे, राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे उद्भवलेल्या पाइपलाइन स्थलांतराचा संपूर्ण खर्च धाराशिव नगर परिषदेकडून करणे सध्यातरी अशक्य असल्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. सदर काम राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आवश्यक झाले असल्याने, संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्वतःच्या खर्चाने किंवा त्यांच्या नियुक्त अधिकृत एजन्सीमार्फत हे काम करून घ्यावे, अशी नगर परिषदेची ठाम भूमिका आहे.
आजच्या या सर्वसाधारण सभेत शहरातील विकासकामे नगर परिषद यंत्रणेमार्फतच करण्यावरही भर देण्यात आला. कोणताही विकास आराखडा राबविताना नगर परिषदेला निधी मिळेल याची काळजी घेऊनच तो राबविला जावा, जेणेकरून नगर परिषदेची आर्थिक स्थिती बिघडणार नाही.
सदर बैठकीत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संग्राम भापकर आणि बांधकाम विभागाचे उप अभियंता सानप यांनी तांत्रिक मुद्दे मांडले. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित केलेल्या निर्णयांवर अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आहे. धाराशिवकरांचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि राष्ट्रीय महामार्गाचे कामही वेगाने व्हावे, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी योग्य तो समन्वय साधून निर्णय घेण्याचे आदेश नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांनी दिले आहेत.




