परंडा – परंडा तालुक्यात चार महिन्यांपासून धुमाकूळ घालून २० ते २५ जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. कपिलापुरी येथे हा बिबट्या यशस्वीरित्या पकडण्यात आला असून, या घटनेमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कपिलापुरीत बिबट्याचा धुमाकूळ
मागील दोन दिवसांपासून बिबट्याने कपिलापुरी गावात दहशत निर्माण केली होती. १८ मार्च रोजी कपिलापुरी येथील दत्तू मसगुडे यांच्या शेळीवर भरदिवसा हल्ला केला. त्याच रात्री वर्धमान जैन यांच्या महेशीच्या दोन रेड्यांवर देखील बिबट्याने हल्ला चढवला. या घटनांमुळे कपिलापुरीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, १९ मार्च रोजी सायंकाळी बिबट्याने पिंजऱ्याचे गज तोडून आत ठेवलेला बोकड घेऊन पसार झाला. यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
Video
बिबट्याची अखेर जेरबंदी
वन विभाग आणि ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी पिंजऱ्याची दुरुस्ती करून पुन्हा पिंजरा लावला. अखेर, २० मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याला पकडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी कपिलापुरीत गर्दी केली.
बिबट्याला पाहण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, हभप बालाजी महाराज बोराडे, माजी नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, यांनी कपिलापुरी येथे भेट दिली. त्यांनी वन विभागाच्या यशस्वी मोहिमेचे कौतुक केले.
वन विभागाने बिबट्याच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्याला जंगलात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. वन विभाग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले असून, यामुळे कपिलापुरी गावासह संपूर्ण परंडा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.