धाराशिव : भारतीय जनता युवा मोर्चाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदाच्या नुकत्याच झालेल्या नियुक्तीवरून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः मराठा समाजातील कार्यकर्त्यांना या प्रक्रियेत डावलण्यात आल्याची भावना युवा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून, पक्षाच्या संघटनात्मक निर्णय प्रक्रियेत सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याची मागणी पुढे आली आहे.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडीनंतर पुन्हा नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याने निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नवीन जिल्हाध्यक्ष निवडताना इच्छुक कार्यकर्त्यांची बैठक किंवा मुलाखती घेण्यात आल्या होत्या का? निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली? संघटनात्मक काम, पक्षनिष्ठा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क यांचा विचार करण्यात आला का, याबाबत वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
‘मराठा समाजाला डावलल्याची भावना’
सोबतच्या निवेदनातही “या प्रक्रियेत मराठा समाजाला वगळण्यात आल्याची भावना युवा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून, पक्षाच्या संघटनात्मक निर्णय प्रक्रियेत सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे,” असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, ही नाराजी कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून निवड प्रक्रियेबाबत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षातील कोणत्याही व्यक्तीविरोधात व्यक्तिगत भूमिका न घेता कार्यकर्त्यांच्या भावना आणि संघटनात्मक लोकशाहीचा सन्मान व्हावा, एवढीच अपेक्षा असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सुरज शेरकर यांचा निवड प्रक्रियेवर आक्षेप
भारतीय जनता युवा मोर्चाचे धाराशिव शहराध्यक्ष सुरज शेरकर यांनीही या नियुक्तीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“धाराशिव जिल्ह्यात युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदासाठी झालेली ही नियुक्ती चुकीची व अन्यायकारक आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ही निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे,” अशी भूमिका शेरकर यांनी मांडली.
“ही निवड कोणत्या निकषांवर झाली, याबाबत स्पष्टता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. आम्ही पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून पक्षाच्या निर्णयांचा सन्मान करतो; मात्र चुकीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणे हेही आमचे कर्तव्य आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून वरिष्ठ नेतृत्वाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घ्यावी, निवड प्रक्रियेचा पुनर्विचार करावा आणि पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने जिल्हाध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी सुरज शेरकर यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.



